Sanjay Raut slams Eknath Shinde | आता आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सीमावादावर तोडगा काढण्यासाठी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार आहेत. पण त्याची गरजच काय आहे, केंद्रीय गृहमंत्र्यांना काय चाललंय हे कळत नाही का? महाराष्ट्रावर अशी वेळ कधीही आली नव्हती. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार हे डरपोक आहे, त्यांनी आपल्या सीमांची आणि जनतेची काळजी नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.

हायलाइट्स:
- संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांच्यावर नाहक आरोप करत आहेत
- त्यांनी आपले तोंड आवरावे
- तुम्ही साडेतीन महिन्यांचा आराम करून बाहेर आला आहात
यावेळी शंभुराज देसाई यांनी अत्यंत तिखट शब्दांत संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटावा, समन्वय साधला जावा, या प्रकरणात महाराष्ट्राची बाजू कशी भक्कम आहे, हे पटवून देण्यासाठी गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी दिल्लीत जाऊन प्रयत्न केले आहेत. तरी संजय राऊत हे सरकार षंढ असल्याचे म्हणतात. संजय राऊत स्वत: कोण आहेत? ज्यांना १५ दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी समन्स पाठवण्यात आले होते. ते पूर्ण करण्याचं धाडसही संजय राऊत यांच्यात नाही. आम्ही शेपूट घातलं म्हणणाऱ्या संजय राऊत यांना न्यायालयीन कवच असतानाही कर्नाटकमध्ये जायची हिंमत करता आली नाही. यावरून ते किती घाबरले होते, हे कळते. मग ते किती मोठे षंढ आहेत, असे आम्ही म्हटले तर चालेल का, असा सवाल शंभुराज देसाई यांनी म्हटले.
तसेच संजय राऊत आम्ही शरद पवार साहेबांच्या नेतृत्त्वाखाली बेळगावमध्ये जाऊ, असे म्हटले. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्त्व सोडले आहे का? राऊतांना शरद पवार हे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मोठे वाटू लागले आहेत का, असा सवाल शंभुराज देसाई यांनी विचारला. हीच गोष्ट आम्ही शिवसेनेत असताना उद्धव ठाकरे यांना सांगत होतो. संजय राऊत यांना शिवसेना पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधायचा होता, असे शंभुराज देसाई यांनी म्हटले.
एकनाथ शिंदेंची ‘भाई’गिरी आता कुठे गेली; संजय राऊतांचा सवाल
संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई दादागिरी करत असताना स्वत:ला भाई म्हणवणारे एकनाथ शिंदे काय करत आहेत. शिंदे स्वत:ला भाई बोलतात, मग आता त्यांनी कर्नाटकविरोधात भाईगिरी करुन दाखवावी. पण हे सरकार महाराष्ट्राच्या जमिनीचं रक्षण करण्यात अपयशी ठरलं आहे. त्यांना एक क्षणही सत्तेवर राहण्याचा अधिकारी नाही. गेल्या ५५ वर्षांत महाराष्ट्राने इतकं हतबल सरकार आणि मुख्यमंत्री पाहिला नव्हता. सरकारच्या दोन मंत्र्यांनी काल शेपूट घातले. हे कसले मर्द आणि स्वाभिमानी. हे तर नामर्दांचं सरकार आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली होती.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.