ratnagiri accident news, मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; कार थेट दरीत कोसळली, ६ जखमी – car falls into valley on mumbai goa highway kashedi ghat 6 injured
रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटात मुंबईकडून खेडच्या दिशेने जाणार्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दरीत कोसळल्याची घटना घडली. हा अपघात मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास धामणदेवी गावाच्या हद्दीत घडला. या दुर्घटनेत चालकासह ६ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सतीश जगताप (३५, रा. संभाजीनगर, कुर्ला, मुंबई) हे कामानिमित्त कोकणात निघाले होते. कारमध्ये त्यांच्यासोबत इतर पाच लोकही होते. मात्र धामणदेवी परिसरातील दत्तवाडी येथे पोहोचले असता सतीश जगताप यांचा कारवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या दरीत कोसळली. या अपघातात चालक सतीश जगताप हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. तसंच दीपाली कर्नाळे (६५), दामोदर कर्नाळे (७०), साक्षी कर्नाळे (४२), स्वराज कर्नाळे (१२), राजेश कर्नाळे (४८) यांना किरकोळ दुखापत झाल्याने सर्वांना तात्काळ रायगड पोलादपूर ग्रामीण रूग्णालय येथे औषधोपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. घाटासारख्या ठिकाणी संरक्षक कठडे नसल्याने अनेकदा चालकाचं नियंत्रण सुटल्याने वाहने थेट खाली दरीत कोसळत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने घाट परिसरातील रस्त्यावर संरक्षक कठडे उभारण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.