मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून जळगावला कच्चा माल घेऊन जाणारा कंटेनर क्रमांक MH 46 AF 7857 च्या कॅबीनमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. कंटेनर चालक मन्नू सिंग (रा. अलाहाबाद, उत्तर प्रदेश) यांच्या वेळीच लक्षात आल्याने प्रसंगावधान राखत कंटेनर रस्त्याच्या कडेला उभा केला त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या शर्तीचे प्रयत्न करत कंटेनरला लागलेली आग आटोक्यात आणली वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
मुंबईहून जळगावच्या दिशेने निघालेल्या मालवाहू वाहनाला आग लागल्याने मुंबई आग्रा महामार्गावर एकच खळबळ उडाली होती. केबिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने कंटेनरच्या समोरील बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग लागल्याबरोबर काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने कंटेनरची संपूर्ण केबिन जळून खाक झालेली आहे.
याआधी अनेक वेळा चालत्या वाहनांना आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभाग तसेच पोलिसांकडून वेळोवेळी वाहने तपासून आणि नादुरुस्त वाहने न वापरण्याचे आवाहन करून देखील वाहनाचे चालक-मालक या सूचनांकडे दुर्लक्ष करत असतात. त्यामुळे अशा घटनांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वाहनांची खात्री करूनच वाहने चालवावीत, असे आवाहन पुन्हा करण्यात आले आहे.