मुंबई : दहिसर ते भाईंदरदरम्यान बांधण्यात येणाऱ्या प्रस्तावित केबल स्टेड उड्डाणपूल उभारणीच्या खर्चात तब्बल १ हजार कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. पूल बांधणीसाठी दुसऱ्यांदा काढण्यात आलेल्या निविदांमध्ये सहा महिन्यांत कामाची किंमत ९०० कोटी रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे कंत्राट खर्च २,४०० कोटी रुपयांपर्यंत वाढणार आहेच; शिवाय येत्या काळात कामाचा वाढीव बोजा पडल्यास आणखी १०० कोटींनी खर्चवाढ होण्याची चिन्हे आहेत.

मुंबईत प्रवेश करणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या वाहनांना दहिसर ते भाईंदरदरम्यान वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसतो. दहा ते पंधरा मिनिटांच्या प्रवासासाठी पाऊण ते एक तास वेळ लागतो. यावर पर्याय म्हणून दहिसर कांदरपाडा ते मिरा रोड-भाईंदर, सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत सुमारे पाच किमीचा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्त्वावर बांधण्यात येणारा हा पूल एकूण सहा मार्गिकांचा आहे. पूर्व मुक्त मार्गाच्या धर्तीवर विनासिग्नल असा हा पूल आहे.

उद्यापासून लसीकरण! गोवर प्रतिबंधासाठी दोन टप्प्यांमध्ये विशेष मोहीम
या पुलासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मदतीने पालिकेने प्रथम फेब्रुवारी, २०२२मध्ये निविदा प्रक्रिया राबवली, तेव्हा केवळ एकाच कंत्राटदराने निविदा भरली होती. त्यामुळे ही निविदा रद्द करण्यात आली. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत १,५०० कोटी रुपये होती. १० ऑक्टोबर, २०२२ रोजी दुसऱ्यांदा निविदा मागवण्यात आल्या. आणखी काही कंत्राटदारांनी निविदा स्पर्धेत सहभागी व्हायची विनंती केल्याने ‘सी’ पाकिट उघडण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.

खाडीदरम्यान ‘व्हुइंग गॅलरी’

‘प्रस्तावित पुलाच्या मार्गात भाईंदर खाडीजवळ खारफुटी असून, ती न हटवता तेथे आधी सुमारे ५० मीटर अंतराचे गर्डर उभारण्याचे ठरवण्यात आले होते. त्याऐवजी आता ३०० मीटरचा सलग एकच गर्डर बांधला जाणार आहे. हा पट्टा ‘व्हुइंग गॅलरी’सारखा असून, दहिसर व भाईंदर या दोन्ही भागातून ही गॅलरी दिसेल, असा नवीन बदल या कामात करण्यात आला आहे. या ठिकाणी नागरिक, पर्यटक येणार असल्याने वाहनतळ व इतर सुविधा तसेच सहा ठिकाणी आंतरबदल करण्यात येणार आहेत, त्यामुळे खर्चात वाढ झाली आहे’, अशी माहिती पालिकेच्या पूल विभागाचे प्रमुख अभियंता संजय कौंडण्यपुरे यांनी दिली.

सन २०१८च्या दर सूचीनुसार हे कंत्राट देण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेवर अतिरिक्त आर्थिक भार येणार नाही. पुलाच्या कामात काही बाबींची वाढ झाल्याने सुमारे ९०० कोटी रुपये खर्च वाढला आहे. – संजय कौंडण्यपुरे, मुख्य अभियंता पूल विभाग, मुंबई महापालिका

राज्यात पुन्हा ‘जलयुक्त शिवार’, ३ वर्षात करणार ५ हजार गावं जलसमृद्ध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here