लव्ह जिहाद व सक्तीचे धर्मांतरणविरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा सकल हिंदू समाजातर्फे हिंदू जनआक्रोश मोर्चा बुधवारी अहमदनगरमध्ये काढण्यात आला होता. त्याचे नेतृत्व कालीचरण महाराज व गुजरातमधील काजलदीदी हिंदुस्थानी यांनी केले. या मोर्चानंतर झालेल्या सभेत या दोघांनी उपस्थितांना संबोधित करत आपले विचार व्यक्त केले.
कालीचरण महाराज म्हणाले, वशीकरण व जादूटोण्याचा वापर लव्ह जिहादसाठी केला जातो. भूतपिशाच्च नाही असे अनेकजण म्हणतात. मग हनुमान चालिसामध्ये भूतपिशाच्चचा उल्लेख कसा? हिंदू धर्मात पुनर्जन्म सिद्धांत, कर्मफल सिद्धांत व मनोविज्ञान आहे. अन्य कोणत्याही धर्मात ते नाही. गजवा-ए-हिंदच्या नावाखाली मागील ८०० वर्षांपासून भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इराण, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगला देश, इंडोनेशिया, कंबोडिया, तैवानपासून थेट ऑस्ट्रेलियापर्यंत भारत होता. पण तो तोडला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज केवळ मराठ्यांचा नाही तर हिंदूंचा राजा आहे. त्यामुळे प्रांतवाद व जातीवाद सोडा आणि हिंदू म्हणून एक व्हा. हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा, असे म्हणणार्या छत्रपती शिवाजी महाराजांना आई तुळजाभवानीने तलवार दिली होती. ती छत्रपतींनंतर आपोआप अंतर्धान पावली आहे. त्यामुळे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न आपण सर्वांनी एकजूटीने पूर्ण केले पाहिजे, असेही कालीचरण महाराज पुढे म्हणाले.
काजलदीदी हिंदुस्थानी म्हणाल्या, ‘हिंदू विरोधकांना कोणत्याही पदावर पाठवले तरी त्यांची जिहादी मानसिकताच असणार आहे. त्यामुळे हिंदू विरोधकांवर आर्थिक बहिष्कार टाकण्याची गरज आहे.
बेटी बचाव व बेटी पढाव बरोबरच बेटी को सशक्त बनावो, हे आता लक्षात घ्यावे. मुलीला जिजाबाई बनवले तरच तिच्या पोटी छत्रपती शिवराय जन्म घेतील. श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे करण्याची हिंमत केवळ आपण आपल्या मुलींनी सक्षम व सशक्त करीत नसल्यामुळे होत आहे. हिंदी चित्रपट, भीतीचे वातावरण, सोशल मिडियातील डेटींग अॅप व ड्रग्जची सवय या चार बाबींतून हिंदू मुलींना जाळ्यात अडकवले जाते व त्यांचे सर्वप्रकारचे शोषण केले जाते, असा दावा त्यांनी केला.