शिरूर तालुक्यातील राजकीय चित्र आगामी निवडणुकीत वेगळे पाहायला मिळेल यात शंका नाही. कारण भाजपचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या निधनानंतर अशोक पवार यांना टक्कर देणारा एकही नेता शिरूर तालुक्यात भाजपकडे नाही. मात्र, त्यातही भाजप डाव टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. कारण राष्ट्रवादीमध्ये असताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले प्रदीप कंद यांचे नाव भाजपकडून घेतले जात आहे. प्रदीप कंद हे पेरणे -वाडे बोल्हाई जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व करतात. त्यांच्या बालेकिल्ल्यात मोठ्या मताधिक्याने ते निवडून येतात. त्यामुळे जर भाजपकडून प्रदीप कंद यांनी जर उमेदवारी दिली तर भाजपकडून शिरूरसाठी पूर्ण ताकत लावण्याची शक्यता आहे. कारण बाबुराव पाचर्णे यांच्यानंतर मंगलदास बांदल हे देखील ताकदीचे नेते शिरूर तालुक्यात होते. मात्र एका जमीन गैरव्यवहार प्रकरणात ते अडकले आणि त्यांना तुरुंगात जावे लागले. त्यामुळे भाजपसमोर प्रदीप कंद नावाचा एक पर्याय आहे.
प्रदीप कंद यांनी नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या गटात असणारी लोणीकंद ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व जागा निवडून आणत पक्ष नेतृत्वाला आपली चुणूक दाखवून दिली होती. त्यामुळे भाजपकडून सध्या तरी त्यांच्या नावाचाच विचार सुरू असल्याची चर्चा आहे.
प्रदीप कंद हे राष्ट्रवादीच्या वातावरणात वाढलेले आणि राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. अजित पवारांमुळे त्यांना पुणे जिल्हा परिषदेत २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरूवातीला उपाध्यक्ष आणि त्यानंतर अध्यक्षपदाची संधी मिळाली होती. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्यानंतर कंद यांना २०१४ मध्ये विधानसभा उमेदवारीची अपेक्षा होती. त्यावेळी मला अजित पवारांनी विधानसभेसाठी शब्द दिल्याचे ते सांगतात. मात्र, अशोक पवार यांच्यासाठी थांबा असे पक्ष नेतृत्वाकडून सांगण्यात आले होते. २०१९ मध्ये त्यांना शिरूर लोकसभेची ऑफर होती. मात्र त्यासाठी कंद यांनी नकार दिला होता. २०१९ च्या विधानसभेलाही अशोक पवार यांना पुन्हा संधी दिल्याने कंद हे नाराज होते. त्यांनी निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र भाजपकडून बाबुराव पाचर्णे यांना उमेदवारी देण्याचे ठरवले होते. त्यामुळे कंद यांना उमेदवारी मिळू शकली नाही. तेव्हा प्रदीप कंद पुन्हा घर वापसी करणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र त्यावेळी ते अजित पवार नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात राहिले.
एवढंच नाही तर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देत प्रदीप कंद यांनी जिल्हा बँकेची निवडणूक जिंकली होती. त्यामुळे राष्ट्रवादीची अडचण झाली होती. प्रदीप कंद हे सध्या जिल्हा बँकेच्या संचालक पदावर कार्यरत असून अन्य कुठलेही पद त्यांच्याकडे नाही. असं असलं तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शिरूरमधून भाजपकडून प्रदीप कंद यांना उतरवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांच्यासारख्या तालुक्यातील दिग्गज राजकीय नेत्यासमोर प्रदीप कंद कितपत यशस्वी ठरतात, हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.