सात हजार ६८२ ग्रामपंचायतीत एकूण ६५ हजार ९१६ सदस्य तसेच थेट सरपंच पदासाठी निवडणूक झाली. त्यापैकी १४ हजार २८ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. तर ६९९ सरपंच बिनविरोध निवडून आले. ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगामार्फत देण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले होते. प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या दाव्यानुसार भाजपने २०२३, राष्ट्रवादी काँग्रेसने १२१५, शिंदे गटाने ७७२, काँग्रेसने ८६१, ठाकरे गटाने ६३९ तर अन्य पक्षांनी ११३५ ग्रामपंचायतींवर विजय मिळविला आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुका राजकीय पक्षांच्या चिन्हावर होत नाहीत. राज्य निवडणूक आयोगाकडे उपलब्ध असलेल्या मुक्त चिन्हातून संबंधित उमेदवारांना निवडणूक चिन्ह दिले जाते. काही ठिकाणी प्रमुख राजकीय पक्ष स्थानिक गटांशी आघाड्या करतात. स्थानिक राजकारणात जातपात आणि नात्यागोत्यांना महत्त्व दिले जाते. यामुळे राजकीय पक्षाचे नेते अधिकच्या ग्रामपंचायती मिळाल्याचा दावा करत आहेत. विविध पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या दाव्यांच्या आधारे ही माहिती आहे. राज्यात दोन हजार ४८२ ग्रामपंचायती जिंकून पुन्हा एकदा भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसने ९०० पेक्षा जास्त ठिकाणी विजय मिळवला. राज्यात प्रथम क्रमांकावर महाविकास आघाडीच आहे, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जिल्ह्यात भाजपचा दारुण पराभव झाल्याचा आरोप करून भाजपचे विजयाचे दावे खोटे आहेत, अशी टीका पटोले यांनी केली. नागपूर जिल्ह्यात २३६ पैकी २०० ग्रामपंचायतींवर काँग्रेसने दणदणीत विजय मिळविला असून, भाजपला नागपूर जिल्ह्यात ३६ जागाही मिळाल्या नाहीत, असे पटोले यांचे म्हणणे आहे.
मुंबईकरांचे पाणी महागले; ७.१२ टक्के दरवाढीला प्रशासकाची मंजुरी; जूनपासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने भार