Maharashtra Politics | राज्य सरकारकडून अधिवेशन लवकर संपवण्याचा प्रयत्न आहे. या मुद्द्यावरुन विरोधी पक्ष नेते अजित पवार आक्रमक झाले आहेत. त्यांनी हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली आहे. या मुद्द्यावरुन आज सभागृहात रणकंदन होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही टोला लगावला.

हायलाइट्स:
- अधिवेशनाचा कालावधी आठवडाभराने वाढवण्याची मागणी
- गायरान घोटाळ्यासंदर्भात उत्तर दिल्याशिवाय त्यांना अधिवेशन संपवता येणार नाही
यावेळी अजित पवार यांनी विधिमंडळ अधिवेशनाचा कालावधी आठवडाभराने वाढवण्याची मागणी केली. गायरान घोटाळ्यासंदर्भात सरकारकडून अपेक्षित उत्तर आलेले नाही. आता राज्य सरकार अधिवेशन आटोपण्याच्या तयारीत आहे. मात्र, गायरान घोटाळ्यासंदर्भात उत्तर दिल्याशिवाय त्यांना अधिवेशन संपवता येणार नाही. अब्दुल सत्तार यांनी गायरान घोटाळ्यासंदर्भात दिलेल्या स्पष्टीकरणाला अर्थ नाही. विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायरान घोटाळा गेल्या सरकारच्या काळात झाल्याचे म्हटले. हा घोटाळा कोणाच्या काळात झाला हे महत्त्वाचे नाही. जेव्हा घोटाळा लक्षात येतो तेव्हा त्याची दखल घेतली पाहिजे. एखादी व्यक्ती दोषी असेल तर ती माहिती समोर आणली पाहिजे. गायरान घोटाळ्यासंदर्भात थातुरमातूर उत्तरं देण्यात अर्थ नाही. घोटाळा कोणत्याही काळातील असो, तो समोर आल्यानंतर कारवाई झालीच पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले. दरम्यान, विरोधकांनी आज पुन्हा एकदा विधिमंडळाच्या आवारात घोषणाबाजी केली. ‘खाऊन खाऊन ५० खोके, माजलेत बोके, माजलेत बोके’, अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या.
अब्दुल सत्तारांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलं?
गायरान जमिनीचे वाटप हे नियमानुसारच झाले. या प्रकरणात उच्च न्यायालय जो निर्णय देईल तो मला मान्य असेल असेही सत्तार यावेळी म्हणाले. मात्र, अब्दुल सत्तार यांच्या या स्पष्टीकरणाने विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला होता. अब्दुल सत्तारांनी स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून वाशीम जिल्ह्यातील १५० कोटींची ३७ एकर गायरान जमीन खासगी व्यक्तीला दिल्याचा आरोप आहे.
अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाणार
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. दरम्यान, आजही विरोधक विविध मुद्यावरुन आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकारमध्ये हिंमत असेल तर अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, असे आव्हान अजित पवार यांनी दिले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.