करोना संसर्गाने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. देशातील सर्वाधिक करोना बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. यात जास्त चिंतेची बाब म्हणजे करोनाने पोलीस दलालाही विळखा घातला आहे. आतापर्यंत जवळपास ८७ पोलिसांचा करोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे. त्याचवेळी आतापर्यंत सुमारे साडेसात हजार पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. या स्थितीतही आपल्या आरोग्याची पर्वा न करता पोलीस कर्मचारी जनतेच्या आरोग्यासाठी अहोरात्र सेवा देत आहेत.
वाचा:
पोलिसांसाठी हा कठीण काळ आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर करोनाशी कुठे गाठ पडेल, हे कुणालाच माहीत नाही. त्यात कुटुंबीयही चिंतेत आणि तणावाखाली वावरत आहेत. ही सारी स्थिती ओळखून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सौभाग्यवती या सध्या अनेक पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी ‘आधार’ बनल्या आहेत. दररोज शक्य होईल तितक्या पोलीस आधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पत्नींशी बोलायचं आणि त्यांना धीर द्यायचा हा आरती देशमुख यांच्यासाठी सध्या नित्यक्रम बनला आहे. अचानक फोन खणखणतो. ‘मी गृहमंत्र्यांची पत्नी आरती देशमुख बोलतेय’, असं समोरून सांगितलं जातं आणि काही क्षण त्यावर विश्वासच बसत नाही. अगदी घरातील वडीलधाऱ्याच्या मायेने आरती देशमुख पोलिसांच्या आप्तांशी संवाद साधत आहेत. या संवादातून एक वेगळंच आपुलकीचं नातं तयार झालंय आणि आपल्या पाठीमागं कुणीतरी भक्कमपणे उभा आहे, हा आत्मविश्वासही चिंताग्रस्त कुटुंबांना मिळाला आहे. आतापर्यंत आरती देशमुख यांनी असे शेकडो कॉल्स केले असून हा मायेचा ओलावा भारावून टाकणारा ठरला आहे.
वाचा:
पती जनतेसाठी सतत घराबाहेर राहून सेवा बजावत असताना घरच्यांना किती काळजी लागून राहिलेली असते, याचा अनुभव मी नेहमीच घेते. यातूनच अहोरात्र सेवा बजावणाऱ्या पोलिसांच्या घरच्यांची काय अवस्था असेल, याचा विचार करून मी अस्वस्थ व्हायचे. करोनाच्या संकटात आपणही या कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, याच भावनेतून मी पोलिसांच्या पत्नींशी संवाद साधते आहे. तुम्ही एकट्या नाहीत. सरकार आणि आम्ही सारेच तुमच्यासोबत आहोत, असे सांगितल्यावर त्यांना मोठं बळ मिळतं. माझ्यासाठी ही खूप मोठी बाब आहे, अशा भावना आरती देशमुख यांनी याबाबत बोलताना व्यक्त केल्या.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times