Sambhaji Mahajaraj Dharmveer or Swarajya Rakshak | हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, त्यांना धर्मवीर म्हणू नका, असे वक्तव्य केले होते. संभाजी महाराजांनी कधीही कोणत्याही धर्माचा पुरस्कार केला नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. त्यानंतर भाजपने अजित पवार यांच्याविरोधात राज्यभरात पद्धतशीरपणे रान उठवायला सुरुवात केली होती.

हायलाइट्स:
- शिवरायांचा अपमान करणारे ‘अण्णाजी पंत’ आज ‘सत्तेवर
- शिवराय अपमानप्रकरणी राज्यपालांना हटवण्याची मागणी करा
- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे तारतम्य बाळगणार आहेत का
अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यासंदर्भात केलेल्या विधानावरून भाजपने धुरळा उडवायला सुरुवात केली आहे. “छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्य रक्षक म्हणतो. ते धर्मवीर नव्हते. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचा कुठे पुरस्कार केला नाही.” असे विधान अजित पवार यांनी करताच भाजपपुरस्कृत धुळवड संघटनांनी गदारोळ सुरू केला. संभाजीराजांचे बलिदान हे धर्मासाठीच होते याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही, पण छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केले त्या स्वराज्य रक्षणासाठीही छत्रपती संभाजीराजेंनी त्याग आणि बलिदान केले. अजित पवार म्हणतात, “छत्रपती संभाजीराजे स्वराज्य रक्षक होते. धर्मवीर नव्हते.” आम्ही म्हणतो, खरा धर्मवीरच स्वराज्याचा रक्षक असतो. तेव्हा त्यात उगाच शेष काढून कोणाला छाती पिटण्याची गरज नाही, असे ‘सामना’त म्हटले आहे.
अण्णाजी पंतांनी संभाजीराजांना स्वराज्यापासून व पित्यापासून तोडले: सामना
अण्णाजी पंत दत्तो व इतर मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले. अण्णाजींच्या गुप्त इशाऱ्यांमुळे दरबारातील इतर मानकरी संभाजी महाराजाना अपमानास्पद वागणूक देऊ लागले. यामागे अण्णाजी पंतांचे कारस्थान होते. पंतांच्याच विरोधामुळे संभाजीराजांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. मुख्य म्हणजे शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजी महाराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधान मंडळाने नकार दिला. त्यामुळे अत्यंत नाइलाजाने शिवाजी महाराजांना कोकणातील श्रृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले. या सगळ्यामागे अण्णाजीपंत दत्तो होते, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. संभाजीराजांना स्वराज्यापासून व पित्यापासून तोडण्याचे मोठे कारस्थान त्या काळात गेल्या कारस्थानाचे सूत्रधार अण्णाजी पंत होते व त्याच अण्णाजीपंतांचे वारसदार आज महाराष्ट्रविरोधी कारस्थानात सामील आहेत, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
भाजप नेत्यांच्या विधानांचा दाखला
उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांवर टीकेची झोड उठवली आहे. अजित पवारांनी तारतम्य बाळगावे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. तारतम्याची भाषा मुख्यमंत्री शिंदे यांनी करावी हे आश्चर्यच आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा अपमान राज्यपाल कोश्यारी व भाजपच्या अनेक पुढाऱ्यांनी केला तेव्हा “राज्यपाल, तारतम्य बाळगा!” असे सांगण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांना झाली नाही. कुणी शिवरायांना माफीवीर’ म्हणाले, तर कुणी ‘इतिहासातील जुने नेते म्हणून शिवरायांची चेष्टा केली. हे काय तारतम्यास धरून होते? राज्यपालांनी शिवरायांचा अपमान करूनही ते राजभवनाची हवा खात बसले आहेत. राज्यपालांविरुद्ध राज्यात संतापाचा उद्रेक झाला, महाविकास आघाडीने विराट मोर्चा काढला. यावर कोणतेही तारतम्य न बाळगता उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हा ननी मोर्चा आहे अशी त्याची संभावना केली. वास्तविक, हा मोर्चा शिवरायांच्या अपमानाविरुद्ध होता याचे तारतम्य तरी फडणवीस यांनी बाळगायला हवे होते, असे मत ‘सामना’तून मांडण्यात आले आहे.
स्वराज्यरक्षक हा आपसूकच धर्मवीर ठरतो: सामना
संभाजीराजांना स्वराज्य व धर्मरक्षणासाठी शेवटी हौतात्म्य पत्करावे लागले. त्यांनी यातना सहन केल्या, मरण पत्करले; पण मोगलांशी तडजोड केली नाही. त्यामुळे स्वराज्य व धर्मरक्षणासाठी संभाजीराजांनी केलेला त्याग व शौर्याचे वर्णन करावयास शब्द नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांच्या राजकीय, आर्थिक, धार्मिक धोरणांवर छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो. त्याच स्वराज्य रक्षणासाठी संभाजीराजांनी इतिहासातील सगळ्यात मोठा त्याग व बलिदान केले. एखादा तपस्वी व धर्मवीरच असे बलिदान करू शकतो, असेही ‘सामना’त नमूद करण्यात आले आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.