सुमारे ७२ दिवसांच्या लॉकडाऊननंतर राज्य सरकारनं जूनच्या सुरुवातीपासून अनलॉकला सुरुवात केली. त्यानंतर सार्वजनिक वाहतूक वगळता सर्व व्यवहार टप्प्याटप्प्यानं पूर्ववत केले जात होते. मात्र, लॉकडाऊन शिथिल होत असताना करोनाचे रुग्णही वाढत गेले. पुणे जिल्ह्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. नागरिकांची बेफिकीरी देखील यास कारणीभूत ठरली. विनाकारण बाहेर पडण्याच्या काही लोकांच्या सवयीमुळं संसर्गाचा धोका वाढला. तो आणखी वाढू नये म्हणून १३ ते २३ जुलै असा दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. यापैकी पहिले पाच दिवस कडक लॉकडाऊन होता. त्यानंतर काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली होती. त्याचीही मुदत आज मध्यरात्री संपत आहे.
वाचा:
लॉकडाऊनची मुदत संपत असल्यामुळं उद्यापासून व्यवहार सुरळीत होतील, अशी अपेक्षा पुणेकरांना आहे. मात्र, परिस्थिती पाहून प्रशासनाकडून पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर लगेचच शनिवार आणि रविवार येत आहे. अशा वेळी बाजारात गर्दी उसळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळं लॉकडाऊन पूर्णपणे उठवावा की सध्याचे निर्बंध पुढचे दोन दिवस कायम ठेवावेत, याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू असल्याचं समजतं.
पुण्यातील करोना रुग्णांची संख्या आतापर्यंत ६० हजारांच्या वर गेली आहे. यात पुणे शहरातील ३९ हजार, पिंपरी-चिंचवडमधील १३ हजार, पुणे ग्रामीणमधील ४ हजार व इतर रुग्णांचा समावेश आहे. करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २५ हजारांच्या पुढं असली तरी दीड हजारांहून अधिक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.
हेही वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times