Nashik News : ‘अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर, आयुष्यात मेहनतीशिवाय, संघर्षाचे चटके सहन केल्याशिवाय यश मिळत नाही पण खरंच प्रत्यक्षात चटके सोसून इतरांची भूक भागवणारी एक महिला नाशिकमध्ये (Nashik) चर्चेचा विषय बनली आहे. ज्योती वाघ (Jyoti Wagh) या कढईतील उकळत्या तेलात हात घालून खाद्यपदार्थ काढत असल्यामुळे त्यांच्या या धाडसामुळे येणारे ग्राहक अचंबित होत असून अल्पवधीत त्यांचा हा फूड स्टॉल नावारूपास आला आहे. 

नाशिकला खाद्य संस्कृती काही नवीन नाही शहरातील अनेक भागात फूड स्टॉल (Food Stall) पाहायला मिळतात. त्याबरोबर अनेक फुट स्टॉलचे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. यातीलच एक म्हणजे ज्योती वाघ. ज्योती वाघ या नाशिक शहरातील अशोका मार्ग परिसरात फूड स्टॉल चालवतात. त्या कढईतील उकळत्या तेलात हाताने वडे, पाववडे, सँडविच असे खाद्यपदार्थ तळण्यासाठी सोडतात तसेच हातानेच काढतात. त्यांचे हे कौशल्य बघून एयणारे ग्राहक चकित होतात. परिस्थितीच्या चटक्यापुढे उकळत्या तेलाचे चटके फिके  असल्याचे वाघ सांगतात. काही वर्षांपूर्वी वाघ यांच्या पतीचे आकस्मिक निधन झाल्यानंतर दोन मुलांचा भविष्यासाठी त्यांना काहीतरी करणे भाग होते. सगळ्यांनीच आधार काढून घेतल्याने त्या आईकडे नाशिकला आल्या. शहरात मिळेल ते काम करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्याचवेळी त्यांनी एका हॉटेलमध्ये काम करायला सुरुवात केली. या ठिकाणी त्या चहा बनवण्याचे काम करीत असत. मात्र मुलं व आईच्या आजारपणाला सुट्टी मिळत नसेल नसल्याने नाईलाजाने काम सोडावे लागले. 

त्यानंतर त्यांनी फूड डिलिव्हरीचे कामही केले. मात्र करोना काळात हे कामही त्यांच्या हातातून सुटले. कोरोनाच्या दुसऱ्या लॉकडाऊननंतर मुलांच्या प्रेरणेने पाववडा विक्रीचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला  त्यांच्या हातात अवघे बाराशे रुपये भांडवल होते. त्यातच एक छोटासा टेबल टाकून नाश्त्याचे पदार्थ विक्रीला सुरुवात केली. या व्यवसायाला त्यांना चांगला प्रतिसाद मिळायला लागल्यानंतर त्यांनी एक फूड स्टॉल सुरू केले आणि वर्षभरात त्यांच्या मेहनतीला फळ आले. या कामात त्यांचा मोठा मुलगा अर्जुनची देखील नेहमीच मदत मिळत असते. गेल्या वर्ष दीड वर्षात त्यांच्या स्टॉलला खूपच प्रसिद्धी मिळाली असून आता इतकी गर्दी होते की ग्राहकांना वेळेत पाववडा मिळावा म्हणून त्या थेट उकळत्या तेलात हात घालून वडे काढून देतात. दिवसभरात त्या 25 डझनहुन जास्त पाववडे विक्री करतात. परिस्थितीच्या चटका पेक्षा उकळत्या तेलाचे चटके फिके असल्याची भावना ज्योती वाघ या व्यक्त करताना दिसतात 

live reels News Reels

ज्योती वाघ म्हणाल्या की, संकटात ज्यांनी साथ आवश्यक होती, त्यांनीच आधार काढून घेतल्याने मात्र जिद्दीने उभे राहिले. केवळ मुलांनी साथ दिली, मन खंबीर केले, खचले नाही. आता अन्यायग्रस्त मनाने खचलेल्या महिला वाघ यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येतात. स्वतःच्या बळावर उभे रहा, स्वावलंबी बना, स्वतःला बांधून ठेवू नका, स्वप्नाच्या दिशेने झेप घ्या असा सल्ला ज्योती या नेहमीच इतर समदुखी महिलांना देतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here