बुलढाणा : समृद्धी महामार्गावर दोन ट्रकला भीषण अपघात झाला असून या अपघातात एका ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री शेलगाव राऊत शिवारात घडली. ज्ञानेश्वर काटकडे (रा. हदगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चालकाचं नाव आहे.

औरंगाबादवरून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रकचा (क्र. एमएच ४० ए. के. ५१०८) चालक अखिलेश कुमार पांडे याला डुलकी लागली त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक सिमेंट भिंतीवर जाऊन आदळला. या अपघातात ट्रकचा टायर फुटला आणि अपघातग्रस्त ट्रक इमर्जन्सी लेनवर जाऊन पलटला. त्याचवेळी मागून येणारा आयशर ट्रक (क्रमांक- एम. एच. २० इ. जी. १५४१) अपघातग्रस्त ट्रकवर आदळला. यामध्ये चालक ज्ञानेश्वर काटकडे यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस उपनिरीक्षक शैलेश पवार, पीएसआय उज्जैनकर, संदीप किरके, काळुसे पोलीस कर्मचारी शरद ठोंबरे, मोहिते, मोहम्मद परसुवाले, क्यूआरव्ही विभागांचे कर्मचारी अनुरूप चव्हाण, उमेश पवार, रुस्तुम कुटे त्यांच्यासह एमएसआरडीसीचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली व अपघातग्रस्तांना आवश्यक मदत करून ट्रक क्रेनच्या साहाय्याने बाजूला करून रास्ता मोकळा केला.

मुंबईकर बँक मॅनेजरला बुलढाण्यातील ऊसाच्या शेतात संपवलं, लॉजची चावी ठरली कारण

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातून जात असलेला समृद्धी मार्ग नुकताच तिथल्या ३०० मजुरांना मागील पाच महिन्यांपासून पगार न मिळाल्याने चर्चेत आला होता. त्याआधी ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महामार्गाचं उद्घाटन झालं. मात्र या महामार्गावर अपघाताची जणू मालिकाच सुरू आहे. त्यामुळे हे अपघात रोखण्यासाठी आता वेगमर्यादेचं काटेकोर पालन केलं जाण्याची गरज अधोरेखित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here