पुणे जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्यात यश आले असून, मृत्यूदर आणि चाचण्या घेण्यात पुणे हे देशात आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी सौरभ राव म्हणाले, ‘पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही वाढत असली, तरी पुणे जिल्ह्यातील मृत्यूचा दर हा देशात, राज्यात आणि मुंबईपेक्षाही कमी आहे.
वाचाः
२५ जून ते २१ जुलै या कालावधीत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही वाढलेली दिसते. चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आल्याने पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. मात्र, रुग्णांवर वेळीच उपचार होत असल्याने मृत्यूदर हा कमी झाला आहे. देशातील मृत्यूदर हा २.४१ टक्के आहे. पुणे जिल्ह्याचा मृत्यूदर हा सरासरी २.३५ टक्के आहे. पुणे शहरातील मृत्यूदर हा २.५१ टक्के आहे. राज्यातील मृत्यूदर हा ३.७५ टक्के, तर मुंबईतील मृत्यूदर हा ५.६१ टक्के आहे’ असे राव यांनी स्पष्ट केले.
वाचाः
पुण्यात निर्बंध कायम
पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात लागू करण्यात आलेला कडकडीत लॉकडाउनचा दहा दिवसांचा कालावधी हा संपला असला, तरी राज्य सरकारचा लॉकडाउन हा ३१ जुलैपेर्यंत असल्याने तोपर्यंत निर्बंध कायम असणार आहेत. त्यामुळे पुण्यातील यापुढील स्थिती ही १३ जुलैपूर्वी होती तशीच राहणार आहे. त्यानुसार दुकाने ही सकाळी नऊ ते सायंकाळी सात या कालावधीत खुली राहणार आहेत. दुकाने ही आठवड्यातून दोन दिवस पूर्ण बंद ठेवण्यात येणार असून, ते दिवस कोणते, याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेण्यात येणार आहे.
कंटेन्मेंट झोनची संख्या कमी
दरम्यान, पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्राची (Contenment zones) संख्या कमी झाली आहे. एक जुलैपर्यंत शहराच्या हद्दीत १०९ कंटेन्मेंट झोन होते ते आता ८७ झाले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times