बांधकामासाठी सेंट्रींगची कामे करणारे मनोहर काशिनाथ अंभग (वय ६८) सुकेवाडी येथे राहतात. त्यांना तीन मुले आहेत. मोठा मुलगा किशोर अभंग (वय ४०) रंगकाम करत होता. दुसरा मुलगा साहेबराव अभंग (वय ३२) हाही सेंट्रींगचे काम करत होता. आठ वर्षांपूर्वी काम करताना साहेबराव याच्या डोळ्यात लोखंडी खिळे गेल्याने तो अंध झाला आहे. त्याचे लग्न झाले असून दोन मुलीही आहेत. मात्र, त्याची पत्नी माहेरी बाभळेश्वर येथे राहते. त्याचा मोठा भाऊ किशोर याचा विवाह झालेला नाही. घरात होणाऱ्या भांडणांमुळे मोठा भाऊ किशोर शिवीगाळ करीत असल्यानेच आपली पत्नी माहेरी निघून गेल्याचा राग साहेबरावच्या मनात होता. शिवाय वडीलही मोठ्या भावाचीच बाजू घेत असल्याचाही राग त्याच्या मनात होता.
यावरून त्यांच्यात सतत भांडणं होत असत. घटनेच्या दिवशी साहेबराव अभंग आणि किशोर अभंग या दोन भावांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यातूनच रात्री दहाच्या सुमारास साहेबरावने अंगणात झोपलेल्या किशोरच्या पोटावर सुरीने वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर तीच सुरी घेऊन साहेबराव वडील झोपलेल्या खोलीच्या दिशेने धावला. दरवाजा ठोठावत ‘एकाला संपविले आता तुमचा नंबर’ असे म्हणत आरडाओरड करू लागला. त्यामुळे वडील घाबरले, त्यांनी दरवाजा उघडला नाही.
आवाज ऐकून शेजारी जमा झाले. त्यांनी किशोरला जखमी अवस्थेत पडलेले पाहिले. शेजारी मदतीला आल्याचे पाहून मनोहर अंभग यांनी दरवाजा उघडला. जखमी किशोरला रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. मनोहर काशिनाथ अभंग यांनी मुलगा साहेबराव याच्याविरूद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. कोर्टाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times