सोनिया यांनी केले नरसिंह रावांचे कौतुक
नरसिंहराव जेव्हा देशाचे पंतप्रधान बनले, तेव्हा देश एक गंभीर आर्थिक संकटातून जात होता. त्यांच्या धाडसी नेतृत्वामुळे देश अनेक आव्हानांना तोंड देऊ शकला, असं कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या.
नरसिंह राव यांच्या नातवाचा सवाल
माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे नातू आणि तेलंगण भाजप नेते एन. व्ही. सुभाष यांनी कॉंग्रेस नेतृत्वाच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कॉंग्रेसला त्यांच्या योगदानाचे कौतुक करण्यास १६ वर्षे कशी लागली? यांच्याशी संबंधित कोणत्याही कार्यक्रमात सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे कधीही उपस्थित राहिले नाहीत, असं एन.व्ही. सुभाष म्हणाले.
‘पीव्ही नरसिंह राव यांच्या योगदानाचे कौतुक करण्यास कॉंग्रेसला १६ वर्षे कशी लागली. नरसिंह राव यांच्या जयंती आणि पुण्यतिथीवर आयोजित कोणत्याही कार्यक्रमात सोनिया गांधी आणि राहुल गांधी कधीच उपस्थित राहिले नव्हते, असं एन.व्ही. सुभाष म्हणाले. एएनआय या वृत्तसंस्थेनेनं याबाबत वृत्त दिलं आहे. २८ जून १९२१ रोजी जन्मलेल्या नरसिंह राव यांचे २३ डिसेंबर २००४ रोजी निधन झाले. कॉंग्रेस आता त्यांचा शताब्दी सोहळा साजरा करीत आहे.
१९९१ पासून ते ९६ पर्यंत देशाचे पंतप्रधान
पी. व्ही. नरसिंह राव हे २१ जून १९९१ ते १६ मे १९९६ पर्यंत भारताचे पंतप्रधान होते. नरसिंह राव यांच्या कार्यकाळात भारतात आर्थिक उदारीकरणाचे रस्ते मोकळे झाले. नरसिंह राव यांच्याशी गांधी कुटुंबीयांचे संबंध चांगले नव्हते, असं सांगितलं जातंय. राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर नरसिंह राव हे पंतप्रधान झाले. नरसिंह राव यांच्या कार्यकाळात काँग्रेस कुटुंबाशी त्यांचे संबंध काहीसे कटुतेचे होते, असं सांगितलं जातं.
गांधी कुटुंबीयांनी माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्याकडे दुर्लक्ष केल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधीवर केली होती. “२००४ ते २०१४ दरम्यान कुठल्याही जाहीर सभेत किंवा कार्यक्रमात पीव्ही नरसिंह राव यांच्या चांगल्या कामांचे कौतुक केले असेल तर त्यांनी पुरावा द्यावेत हे आपले कॉंग्रेसला आव्हान आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या वर्षी लोकसभेत म्हणाले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times