नाशिक : तांबे कुटुंबीय आणि ठाकरे गटाच्या खेळी-प्रतिखेळीमुळे नाशिक पदवीधर निवडणुकीत रंगत भरली आहे. या मतदारसंघातील एकूण अडीच लाखांवर उमेदवारांपैकी तब्बल एक लाखावर उमेदवारांची नोंदणी एकट्या नगर जिल्ह्यातून असून, हा तांबेंचा बालेकिल्ला आहे. मात्र, उर्वरित दीड लाख मतांचा विचार करता नाशिक या निवडणुकीचे केंद्रबिंदू ठरण्याची चिन्हे आहेत.

काँग्रेसचे मावळते आमदार डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने अधिकृत उमेदवारी देऊनही त्यांनी ऐनवेळी माघार घेतल्यावर त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी नाट्यमयरीत्या अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे प्रारंभीच्या टप्प्यात ही निवडणूक एकतर्फीच समजली जात होती. मात्र, ठाकरे गटाने अपक्ष शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्याची खेळी करीत नाशिकच्या पदाधिकाऱ्यांकडे निवडणुकीची जबाबदारी सोपविली आहे. ठाकरे गटाचा पाठिंबा मिळालेल्या पाटील यांच्यासाठी नाशिकसह जळगाव, धुळे आणि नंदुरबारमधील मतदार तांबेंच्या तुलनेत नजीकचे असल्याने ही निवडणूक तुल्यबळ ठरण्याची शक्यता आहे.

Nashik Graduates Election: माझ्यावर अन्याय झाला; काँग्रेसमधून निलंबित झाल्यानंतर सुधीर तांबेंचं परखड ट्विट

नगरसोबतच उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये सुधीर तांबे यांचा जनसंपर्क असल्याचा फायदा त्यांना मिळू शकतो, असा अंदाज प्राथमिक टप्प्यात वर्तविण्यात आला होता. मात्र, नंतरच्या नाट्यमय घडामोडींनी या निवडणुकीला वेगळेच रंग मिळत गेले. सुधीर तांबे यांनी चिरंजीव सत्यजित यांना पुढे चाल दिल्यावर ठाकरे गटाने धुळ्यातील उमेदवारास पाठिंबा देत नाशिकमधील पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर या निवडणुकीची जबाबदारी दिली. त्यामुळे एकट्या नगर जिल्ह्यातील मतदारांच्या संख्यात्मक बळासोबतच इतरही बदलती समीकरणे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. ठाकरे गटाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा उत्तर महाराष्ट्रात असणारा जनसंपर्क, नाशिकमधील ठाकरे गटाच्या नेत्यांचे त्यांना मिळणारे पाठबळ आदी समीकरणे नगरच्या मतदारांच्या संख्यात्मक वर्चस्वासमोर नवे आव्हान उभे करताना दिसत आहेत. दरम्यान, आज अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी घडणाऱ्या घडामोडीही या निवडणुकीची आणखी समीकरणे स्पष्ट करण्याची चिन्हे आहेत.

अडीच लाखांपैकी लाखावर मतदार नगरचे

पदवीधर मतदारसंघासाठी एकूण दोन लाख ५८ हजार ३५१ उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे. त्यात नगर जिल्ह्यातून एक लाख १६ हजार मतदार आहेत, तर नाशिक जिल्ह्यातून अवघे ६६ हजार ७०९ मतदार आहेत. जळगाव जिल्ह्यातून ३३ हजार, धुळे जिल्ह्यातून २२ हजार, तर नंदुरबारमधून सुमारे १९ हजार मतदारांची नोंदणी झालेली आहे. नाशिक जिल्ह्याच्या तुलनेत नगर जिल्ह्यात सुमारे ४७ हजार मतदार जास्त आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here