नाशिक शहरात एकाच दिवशी हत्येच्या दोन घटना घडल्या आहेत. काल दुपारच्या सुमारास वडिलांनी मुलीचा गळा हत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर सातपूर परिसरातील गोरक्षनाथ रोड, काश्मीरे मळा परिसरात रात्री साडे ११ ते १२ वाजेच्या दरम्यान दोन जणांमध्ये जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यात एका जणाकडून दुसऱ्याच्या डोक्यात रॉड मारून त्याला गंभीर जखमी करून त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे.
सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात पुन्हा होणार कुस्तीची लढत, ‘त्या’ वादाला पूर्णविराम लागणार?
संतोष जैस्वाल (वय ३०) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून, या हत्येतील दोघे आरोपी फरार झाले आहेत. घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात घटनेचा पंचनामा केला असून रात्री उशिरापर्यंत सातपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाच्या कुरापतीतून ही हत्या झाल्याचे म्हटले जात आहे. परंतु याबाबतचे अद्याप खरे कारण समोर येऊ शकलेलं नाही. पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बाजारपेठेत काही तरुणांनी दहशत माजवत तरुणावर जीवघेणा हल्ला केला होता. तर काही दुकानांची व वाहनांची तोडफोड देखील केली होती. त्यानंतर शहरात हत्येच्या दोन घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.