भाजपकडून ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केले जाणार आहेत. ही निवडणूक बिनविरोध झाली, तर टिळक कुटुंबातील सदस्याला विधानसभेची उमेदवारी मिळू शकते. याशिवाय ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्नही या माध्यमातून केला जाणार आहे. ही निवडणूक बिनविरोध न झाल्यास काय करायचे, याबाबतही भाजपच्या प्रदेश नेतृत्वांमध्ये प्राथमिक चर्चा झाली आहे. कसब्यातील मूळचे मात्र सध्या कोथरूड आणि सिंहगड रस्ता परिसरात राहणारे १५ ते २० हजार मतदार आहेत. या मतदारांमध्ये भाजपला मानणारा वर्ग अधिक आहे.
काँग्रेस निवडणूक लढणार
शहर काँग्रेसमध्ये कसबा विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झडली असून ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने केला आहे. त्याबाबतचा अहवाल प्रदेश काँग्रेसला देण्यात आला आहे. महाविकास आघाडीची याबाबत लवकरच बैठक होणार असून त्यात निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर होईल. कसब्याची जागा ही काँग्रेसकडे असून, याठिकाणाहून उमेदवार देण्यात येईल. उमेदवाराची चाचपणी करण्यात आली आहे. प्रदेश पातळीवर त्याबाबत एकमत करून तसा अहवाल दिल्लीला पाठवला जाईल आणि उमेदवारी जाहीर होईल.