निलेश जाधव हेदवी गावातील जुळेवाडी पन्हाळगड येथे राहत होता. या अपघातामुळे जाधव कुटुंबातील एकुलता एक मुलगा हिरावला गेला आहे. निलेशचे वडील शशिकांत जाधव गवंडी काम करतात. निलेशच्या पश्चात आई-वडील व छोटी बहीण असा परिवार आहे. चालक म्हणून गावातल्या अनेकांना उपयोगी पडत होता. हेदवी येथील हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत त्याचे शिक्षण झाले होते.
गेल्यावर्षी गणपतीच्यावेळी निलेश मुंबईहून गावी परतला होता. पुढील काही महिने तो गावातच राहिला. दोन वर्षांपूर्वी त्याने गावात टेम्पोचा व्यवसाय सुरु केला होता. परंतु, हा व्यवसाय फारसा न चालल्यामुळे काही दिवसांपूर्वीच निलेश मुंबईला परतला होता. निलेश उत्तम चालक व गावातील अनेकांना उपयोगी पडणारा तरुण होता. त्याच्या जाण्याने हेदवीतील मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.
कारने येण्याऐवजी ट्रॅव्हल्सने गेला अन् जीव वाचला
कोकणात मुंबई गोवा महामार्गावरती माणगाव येथे झालेल्या अपघातात गुहागर तालुक्यातील हेदवी येथील जाधव कुटुंबावर निष्ठूर नियतीने घाव घातला आहे. मुलगी,जावई, नातवंड अशी एकूण जवळची दहा माणसं गमावली आहेत. सुदैवाने याच कुटुंबातील निलेश मनोहर जाधव हा आजच ट्रॅव्हल्सने गुरुवारी सकाळीच गावात पोहोचला होता. तोही याच इको कारमधून येणार होता, पण तो ऐनवेळी ट्रॅव्हल्सने हेदवीला आला आणि त्याचा जीव वाचला. हे कुटुंब आजी शेवंती सखाराम जाधव यांच्या वर्षश्राद्धसाठी हेदवी येथे येत होते.१०३ वर्षांची असलेल्या आजीचे गेल्यावर्षी निधन झाले होते. गुरुवारी १९ जानेवारी रोजी आजीचे वर्षश्राद्ध होते. त्यासाठी हे सगळे नातेवाईक हेदवी येथे येत होते.
आई, वडील,बहीण संपूर्ण कुटुंब संपलं
या अपघातात हेदवी, सावंतवाडी आणि डावखोतमधील एकूण १० जणांचा मृत्यू झाला आहे. मूळचं डावखोतमधील आणि मुंबईत वास्तव्यास असलेलं पंडित कुटुंब संपूर्णपणे या अपघातामध्ये मृत्यमुखी पडले. मूळचे डावखोतमधील असणारे आणि मुंबईत मेडिकलमध्ये काम करणारे निलेश पंडित (४५), त्यांची पत्नी नंदिनी पंडित (३५) , त्यांची कन्या मुद्रा पंडित (१२) यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर, अपघातात जखमी झालेल्या भव्य पंडित या ४ वर्षांच्या मुलाचाही नंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला.