Maharashtra Political crisis | संजय राऊत आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये सातत्याने शाब्दिक लढाई सुरु असते. त्यासाठी शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनातून शिंदे गटाच्या नेत्यांवर अनेकदा टीका केली जाते. सोमवारी म्हणजे २३ जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्याच्या पूर्वसंध्येला सामनाच्या पहिल्या पानावर एक जाहिरात छापून आली आहे. ही जाहिरात सध्या चर्चेत आहे.

हायलाइट्स:
- संजय राऊतांचं शिंदे गटावर पुन्हा टीकास्त्र
- ‘साहेब मी गद्दार नाही’
साहेब मी गद्दार नाही!गेलेल्या ४० गद्दारांना गाडून पुन्हा त्याच उमेदीने उभे राहू तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने अभिवादन केले याचे समाधान आमच्यासारख्या शिवसैनिकांना मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र…, असा मजकूर या जाहिरातीमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता शिंदे गटाचे नेते या टीकेला प्रत्युत्तर देताना आक्रमक होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या ४० आमदारांसह उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यापासून ते सातत्याने बाळासाहेब ठाकरे हे आपले श्रद्धास्थान आहेत, हे ठसवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि वारसा पुढे नेत आहोत, असे शिंदे गटाकडून सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर शिंदे गटाने आपल्या पक्षाचे नाव ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे ठेवले आहे. परंतु, आता राऊत बंधुंनी शिंदे गटाच्या आमदारांना पुन्हा एकदा गद्दार संबोधून राजकीय वादाला तोंड फोडले आहे. या मुद्द्यावरुन आता शिंदे गट आणि ठाकरे गटात द्वंद्व पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
संजय राऊत शिंदे गटाच्या रडारवर
बंडखोरी करत पक्षातून बाहेर पडल्यानतंर अगदी पहिल्या दिवसापासून शिंदे गटाचे आमदार आणि नेते आम्ही घेतलेल्या टोकाच्या निर्णयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि संजय राऊत जबाबदार असल्याचे सांगत आहेत. संजय राऊत यांच्यासारखे लोक आम्हाला उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत. संजय राऊत यांनी शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली होती, अशी टीका शिंदे गटाकडून सातत्याने केली जाते.
संजय राऊतांची ‘सामना’तून जळजळीत टीका
संजय राऊत हे सातत्याने ‘सामना’तील अग्रलेखांमधून शिंदे गटाच्या आमदारांवर आसूड ओढत असतात. अलीकडेच त्यांचा एक अग्रलेख चर्चेचा विषय ठरला होता. सुप्रिया सुळे, अजित पवार, धनंजय मुंडे यासारख्या राजकीय विरोधकांच्या अपघातांचा दाखला देत अघोरी विषयांच्या चर्चांना हवा मिळाली आहे. जादूटोणा, लिंबू-मिरची, टाचण्या, काळ्या बाहुल्या, रेडा बळी ही काही महाराष्ट्र राज्याची ओळख असता कामा नये. तशी ती होताना दिसत असल्याची टिप्पणी अग्रलेखातून करण्यात आली होती.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.