Authored by आदित्य भवार | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 24 Jan 2023, 2:24 pm

Maharashtra Crime news | गेल्या अनेक वर्षांमध्ये सरकारने कठोर कायदे करुनही जातीपातीचे भूत अनेकांच्या मानगुटीवरुन अद्याप उतरलेले नाही. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात जातपंचायतीचा त्रास सहन करावा लागत असल्याची घटना समोर आली आहे. श्रीगौड ब्राम्हण समाजाच्या जातपंचायतीमधील सदस्यांच्या विरोधात समाजातीलच काही लोकांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता पोलीस काय कारवाई करतात, हे बघावे लागेल.

 

shreegoud brahman samaj jat panchayat
जात पंचायती विरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा

हायलाइट्स:

  • विनवण्या आणि लेखी पत्र देऊनही जात पंचायतने दखल घेतली नाही
  • जाचाला कंटाळून जात पंचायतीविरोधात पोलिसांत धाव
पुणे: श्रीगौड ब्राम्हण समाजाच्या जातपंचायतीच्या २३ वर्षांच्या मनमानी कारभाराला कंटाळून समाजमधून बहिष्कार घातलेल्या एक व्यक्तीने पुण्याच्या बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. श्रीगौड ब्राम्हण समाजाच्या मुलीबरोबर लग्न केलं नाही म्हणून २३ वर्षांपूर्वी संबंधित व्यक्तीला जातपंचायतीने बहिष्कृत करत वाळीत टाकले होते. अनेक विनवण्या आणि लेखी पत्र देऊनही जात पंचायतने दखल घेतली नाही. त्यामुळे बहिष्कार घालण्यात आलेल्या व्यक्तीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेशी संपर्क साधत बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या बाबत प्रकाश नेमचंद डांगे (वय ४६ रा.हरपळे गल्ली गणपती मंदिर शेजारी , फुरसुंगी पुणे) यांनी तक्रार दिली आहे. या बाबत जात पंचायत सदस्य ताराचंद काळूरम ओजा ,भरत नेमचंद मावणी, प्रकाश लालूचांद बोलद्रह उर्फ शर्मा, संतोष उणेसा, मोतीलाल भोराम शर्मा डांगी, बाळू शंकरलाल डांगी, प्रकाश असुलाल ओजा, भवरलाल डांगी, हेमराज ओजा, या जात पंचायत सदस्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महाराष्ट्राला हादरवणारी घटना: आंतरजातीय विवाह केल्याने १५० जोडप्यांवर जातपंचायतीचा बहिष्कार; आरोपींवर गुन्हा दाखल
श्रीगौड ब्राम्हण समाज हा मूळचा राजस्थान येथील किव्हाड पाली जिल्ह्यातील आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या समाजातील मुलींची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे. त्यामुळे श्रीगौड ब्राम्हण समाजातील मुलांनी लग्नासाठी मुली मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे अनेक मुलांनी पोटजातीत किंवा आंतरजातीय लग्न करत आपला जोडीदार निवडला. ज्या मुलांनी आंतरजातीय किव्हा पोटजातीमधील मुलींसोबत लग्न केलं त्यांना समाजाच्या जातपंचायतीने त्यांच्या कुटुंबीयांसह वाळीत टाकले. समाजातून वाळीत टाकल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील इतर मुलांची लग्न होत नाहीत. तसेच कुठल्याही नातेवाईकांच्या मंगलकार्यात , अथवा दुःखद परिस्थितीत त्यांना सहभागी होता येत नाही. केवळ जात पंचायतीच्या मनमानी कारभारामुळे त्यांना हा त्रास सहन करावा लागतो. यातून बाहेर पडता यावं यासाठी प्रकाश डांगे यांच्यासह जातपंचायतीच्या जाचाला कंटाळेलल्या लोकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे मदतीचा हात मागितला. याच लोकांच्यावतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुणे पोलिसांकडे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here