पुणे: संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारे हत्याकांड पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात घडले. सख्ख्या चुलत भावांनी कौटुंबिक वादातून सात जणांची हत्या करून मृतदेह भीमा नदी पात्रात फेकून दिले होते. सुरुवातीला त्या आत्महत्या वाटत होत्या. मात्र नंतर त्या हत्या असल्याचे समोर आले. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना ताब्यात देखील घेतले आहे. आता या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाची समोर आली आहे.

अधिक माहिती मिळवण्यासाठी सातपैकी तीन मृतदेहांचे पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले आहे. सात जणांची हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी काल दिली. मात्र त्यांची हत्या कोणत्या प्रकारे करण्यात आली याबद्दल पोलीस अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सातपैकी तिघांचे शवविच्छेदन आज पुन्हा करण्यात आले. त्यासाठी ससून रुग्णालयाची एक टीम काही वेळापूर्वी यवत येथे पोहोचली होती. तहसीलदारांसमोर शवविच्छेदन करण्यात आले. तिघांवर विषप्रयोग झाला का, त्यांचा गळा आवळून मग त्यांचे मृतदेह नदीत फेकण्यात आले का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
घरातून निघाले, रेल्वे स्टेशन गाठले, प्लॅटफॉर्मवर घुटमळले; अखेर दोघांचं ठरलं अन् सगळंच संपलं
मोहन पवार, त्यांच्या पत्नी संगीता पवार, मुलगी राणी, जावई शाम आणि त्यांच्या ३ मुलांचे मृतदेह नदीत सापडले होते. १७ जानेवारीला हे कुटुंब नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोजमधून दौंड तालुक्यातील पारगावला पोहोचले. त्यानंतर त्यांनी भीमा नदीपात्रात उडी घेत सामूहिक आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते.

शवविच्छेदन अहवालातून सर्वांचा मृत्यू बुडून झाला असल्याचे समोर आले होते. परंतु नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला होता. त्यावर पोलिसांनी तपास केला असता, मोहन पवार यांच्या चुलत भावांनी पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना नदीत फेकून दिलाचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्यावरून पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा नोंद करून अटक केली आहे.
मला जगायचंय, पण…; ज्या हातांवर मेहंदी काढली, त्याच हातांवर व्यथा मांडत आयुष्य संपवलं
मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हत्याकांड
मोहन पवार यांच्या मुलासोबत आरोपीचा एक मुलगा दुचाकीवर काही दिवसांपूर्वी लोणीकंद येथे गेला असताना त्याचा अपघात झाला होता. या घटनेत मुलगा गंभीर जखमी होऊन त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र पवार कुटुंबाने ही बाब चार दिवस मुलाच्या पालकांना सांगितली नव्हती. या घटनेत दुर्दैवाने मुलाचा मृत्यू झाला. आपल्या मुलाचा खून पवार कुटुंबीयांनी केल्याचा संशय चुलत भावांना होता. या रागातून त्यांनी बदला घेण्याचा कट रचला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणात पोलिसांनी अशोक कल्याण पवार (वय ३९), श्याम कल्याण पवार (वय ३५), शंकर कल्याण पवार (वय ३७), प्रकाश कल्याण पवार (वय २४) आणि कांताबाई सर्जेराव जाधव (वय ४५) अशा पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेले आरोपी हे मृतक मोहन पवार यांचे सख्खे चुलत भाऊ आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here