वाचा:
नगरमध्ये करोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे पाच दिवसांचा कर्फ्यू लावावा, अशी मागणी सुजय विखे यांनी केली होती. तसे पत्रही सुजय यांनी जिल्हाधिकारी यांना दिले होते. मात्र, लॉकडाऊन करण्याची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये तीन दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत सांगण्यात आले. त्यावरून मुश्रीफ यांनी नगरमध्ये लॉकडाऊन होणार नसल्याचे स्पष्ट करीत विखे यांची मागणी फेटाळली. मात्र, आता लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून विखे यांनी पुन्हा एकदा आज आपली भूमिका मांडली. नगरच्या जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.
वाचा:
‘नगरमध्ये करोनाची परिस्थिती हाताबाहेर जात असली तरी प्रशासन ते मान्य करण्यास तयार नाही. प्रशासन माझे ऐकत नसल्यामुळे मला जनतेसमोर खुले आवाहन करावे लागत आहे. सध्या माध्यमे जागृत असल्यामुळे करोना बाधितांचे आकडे बाहेर येत आहेत. नगरमध्ये तर एका रुग्णाला टॅम्पोतून टाकून नेल्याचा प्रकार बाहेर आला आहे. उद्या अशा गोष्टी तुमच्या ओळखीत होतील तेव्हा तुम्हाला त्याची जाणीव होईल. परिस्थिती हाताबाहेर असतानाही प्रशासन बैठकीत कोणते आकडे सांगतात व कोणते नाही, ही त्यांचीच जबाबदाही आहे. सध्या मी विरोधी पक्षात असल्यामुळे माझ्याकडे म्हणणे मांडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक डॉक्टर या नात्याने काय केले पाहिजे, याची सूचना मी पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना केली. लॉकडाऊन बाबत विनंती करण्याशिवाय माझ्यासमोर पर्याय नाही. कारण मी स्वतः जाऊन प्रत्येक घर बंद करू शकत नाही,’ असेही विखेंनी स्पष्ट केले.
वाचा:
बेड मिळवण्यासाठी पुढाऱ्यांना फोन करावा लागतोय
‘लॉकडाऊन झाला नाही तर दररोज सहाशे ते सातशेवर करोना बाधितांचा आकडा जाऊ शकतो. लॉकडाऊन हा काही आजार थांबविण्यासाठी नाही. पण आज रुग्णांना हॉस्पिटलमध्ये झोपण्यासाठी सुद्धा जागा मिळत नाही. जिल्हा रुग्णालय, बूथ हॉस्पिटल येथे पुढाऱ्यांना फोन करून बेड मिळवण्यासाठी वशिला लावावा लागतोय. हॉस्पिटलं मोकळी व्हावीत व पुढच्या परिस्थितीसाठी बेड रिकामे व्हावेत, यासाठी कर्फ्यू लावणे महत्त्वाचे आहे,’ असेही खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times