भुवनेश्वर : ओडिशाचे आरोग्यमंत्री नबा किशोर दास यांचा सहायक पोलीस उपनिरीक्षकानं केलेल्या गोळीबारामुळं मृत्यू झाला आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षकानं त्यांच्यावर आज सकाळी गोळीबार केला होता ते या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. दास यांना भुवनेश्वरला एअरलिफ्ट करुन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी रुग्णालयात जाऊन यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. अपोलो रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी नबा दास यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. पीटीआयनं यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. ओडिशातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नबा दास यांच्यावर झरसुगुदा जिल्ह्यात आज सकाळी सहायक पोलीस उपनिरीक्षकानं गोळीबार केला. दास यांना तातडीनं पोलिसांनी तातडीनं स्थानिक रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर दास यांना एअरलिफ्ट करुन भुवनेश्वरला आणण्यात आलं होतं. नबा दास यांच्यावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते. एका कार्यक्रमासाठी जात असताना नबा दास यांच्यावर पोलीस अधिकाऱ्यानं गोळीबार केला. नबा दास यांनी आज सकाळी विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी चिमुकल्यांना शाबासकी दिली होती त्यानंतर सभेला संबोधित केलं होतं. सहायक पोलीस उपनिरीक्षक गोपाल दास असं गोळीबार करणाऱ्याचं नाव आहे. पोलीस अधिकाऱ्यानं गोळीबार का केला याचं कारण समोर आलं नाही. या पोलीस अधिकाऱ्याला मंत्र्याच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलं होतं. मंत्री गाडीतून उतरत असताना त्याच्या गाडीजवळ जात गोपाल दास यानं गोळीबार केला. या घटनेत एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्याची माहिती आहे. नवीन पटनाईक यांनी अपोलो रुग्णालयात जाऊन नबा दास यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. रुग्णालयातच त्यांनी नबा दास यांच्या मुलाशी देखील चर्चा केली होती. या संकटाच्या काळात ते सोबत असल्याचं त्यांनी दाखवून दिलं होतं. नबा किशोर दास हे नवीन पटनाईक यांचे विश्वासू सहकारी होते. आगामी निवडणुकीपूर्वी त्यांच्या निधनानं नवीन पटनाईक यांना धक्का बसला आहे. काहीच दिवसांपूर्वी नबा किशोर दास यांनी ७ दिवसांपूर्वी शनिशिंगणापूरच्या शनि देवाला एक कोटी रुपयाचा कलश अर्पण केला होता. एक किलो सातशे ग्रॅम सोने आणि पाच किलो चांदीचा उपयोग करून हा कलश तयार करण्यात आला होता.
Home Maharashtra चिमुकल्यांना शाबासकी दिली,पुढील कार्यक्रमाला जाताना अनर्थ, पोलिसाच्या गोळीबारामुळं आरोग्यमंत्र्यांचा मृत्यू