‘सत्ता न मिळाल्याने भारतीय जनता पक्षाची अवस्था पाण्याबाहेर असलेल्या माशासारखी झाली आहे,’ अशी खोचक टीका राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी केली. ‘चंद्रकांत पाटलांना एकरातील, हेक्टरातील फरक समजत असेल, परंतु ते शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकले नाहीत,’ असा टोलाही त्यांनी लगावला.
मंत्रिपद आणि खातेवाटपावरून महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर येत असून, हे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापासून भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळींकडून होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात पत्रकारांशी बोलताना थोरात यांनी भाजपच्या टीकेला खरमरीत प्रत्युत्तर दिले. ‘भाजप विरोधी पक्षात असून, सत्ता न मिळाल्याने त्यांची स्थिती पाण्याबाहेरच्या माशासारखी झाली आहे,’ असा चिमटा त्यांनी काढला, तसेच सरकार पाच वर्षे पूर्णपणे टिकेल, असा विश्वासही व्यक्त केला. खातेवाटपाबाबत पक्षात व्यक्त होत असलेल्या धुसफुशीबाबत विचारणा केली असता, ‘राज्यात तीन पक्षांचे सरकार असून, जागा मर्यादित आणि इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे चांगल्या नेतृत्वाला संधी देता येत नाही,’ अशी कबुलीही त्यांनी दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times