पुणे : भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत पुण्यात सर्वच पक्षात राजकीय संघर्ष मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. एकीकडे कसब्याला बालेकिल्ला म्हणणाऱ्या भाजपला उमेदवार निवडीसाठी सर्व्हेचा सहारा घ्यावा लागत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीत जागा कोणी लढवायची? यावरून सावळा गोंधळ सुरू आहे. महाविकास आघाडी म्हणून लढविण्याची अधिकृत घोषणा अद्यापही झालेली नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख घटक पक्षांची यावर एकही संयुक्त बैठक झालेली नाही. त्यामुळे पोटनिवडणुकीत कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल हे निश्चित न झाल्याने तिन्ही पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून वैयक्तिक पातळीवर तयारी सुरू झाल्याचे चित्र आहे. त्यातून एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. यामुळे पुण्यातील ही निवडणूक महाविकास आघाडीत बिघाडी करणार असं बोललं जात आहे. काँग्रेसचे नेते कश्मीरमध्ये, व्हिडीओ कॉलवर मुलाखती! कसबा पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वात आधी महाविकास आघाडीमध्ये कसबा हा काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ असल्याचा दावा करत ही निवडणूक आपणच लढणार असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्यासाठी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज देखील मागवून घेतले. मात्र त्यापुढे काही विशेष हालचाल होताना दिसली नाही. कारण राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा समारोप असल्याने राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते हे त्यांच्यासोबत होते. राज्यातील प्रमुख नेते महाराष्ट्रात नसल्याने महाविकास आघाडीत ही जागा कोणी लढायची याबाबत कुठलीही चर्चा होत नाहीये. काँग्रेसकडून कुठल्याही प्रकारचा संवाद होत नसल्याचा आरोप आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष करत आहेत आणि यामुळेच सुरुवातीला ही जागा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस लढवेल अशी म्हणणारी राष्ट्रवादी देखील आता कसब्याच्या रिंगणात उतरली आहे. यातच आता शहर जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने काँग्रेस भवन येथे कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून मंगळवारी मुलाखती घेण्यात आल्या. पोटनिवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसकडून आमदार संग्राम थोपटे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. काँग्रेसकडून प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, माजी महापौर कमल व्यवहारे, माजी नगरसेविका नीता रजपूत, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी, बाळासाहेब दाभेकर या प्रमुख उमेदवारांबरोबरच विजय तिकोणे, आरिफ कांचवाला, संजय कांबळे, भोलेनाथ वांजळे, योगेश भोकरे, ऋषिकेश वीरकर, गौरव बाळंदे, अस्लम बागवान, शिवाजीराव आढाव यांनी मुलाखती दिल्या आहेत. कसबा काँग्रेसचा नाहीच, इथं राष्ट्रवादीची ताकद! कसबा पोटनिवडणूक जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही जागा आघाडीमध्ये काँग्रेसने लढवावी असं बोललं गेलं. मात्र काँग्रेस कडून कुठलाही संवाद होत नसल्यानं आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसच या मैदानात उतरली असून कसबा ही जागा काँग्रेसची नाहीच असं ठणकावून सांगितलं आहे. पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसनेच लढवावी, असा एक ठराव मंगळवारी (३१ जानेवारी) झालेल्या पक्षाच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख ५ इच्छुकांची नावेही पक्षकडून प्रदेशकडे पाठविण्यात आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नव्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कसब्याची जागा कधी काँग्रेसची नसल्याचा दावा केला आहे. १९९९ पासूनच आम्ही आघाडीत आहोत. वास्तविक पाहता ही जागा राष्ट्रवादीची होती. २००९ साली सुशीलकुमार शिंदे यांनी ही जागा रोहित टिळक यांच्यासाठी मागून घेतली होती. पवार साहेबांनी सुद्धा त्यांचा सन्मान ठेवला होता. त्याच्यामुळे ही जागा काँग्रेसची कधीच नव्हती ही जागा राष्ट्रवादीची होती, असा दावा जगताप यांनी केला आहे. तर २०१४ आणि २०१९ चा निकाल पाहता आणि राष्ट्रवादीचा अनुभव पाहता राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे आणि यंत्रणा देखील राष्ट्रवादीच राबवू शकते, असं देखील प्रशांत जगताप म्हणाले आहेत. राष्ट्रवादीकडून रुपाली पाटील-ठोंबरे, अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, वनराज आंदेकर हे इच्छुक आहेत आणि यांची यादी वरिष्ठ नेत्यांकडे देखील पाठवली आहे. त्यामुळे कसब्यात महाविकास आघाडीमध्ये नवा संघर्ष सुरू झाला आहे. कसबा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आम्ही निवडणूक लढवणारचनुकतीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत कसबा पोटनिवडणूक शिवसेनेने लढावी, असा एकमुखी सुरू उमटला आहे. शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात एक बैठक पार पडली. या बैठकीत कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक शिवसेनेने लढवावी आणि उमेदवारी शहराध्यक्ष संजय मोरे यांनी द्यावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी संपर्क प्रमुखांकडे केली आहे. हा निरोप उद्धव ठाकरे यांच्या पाठवला देखील आहे. कसब्यात शिवसेनेची मोठी ताकद आहे आणि याच ताकदीच्या जीवावर भाजपने २५ वर्ष उमेदवार निवडून आणले असा दावा शिवसेनेने केला असून कसब्यात महाविकास आघाडीत शिवसेनेलाच तिकीट मिळलायला हवं, असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरला आहे. आता स्वतंत्र पक्षाची बैठक, इच्छुक उमेदवारांच्या नावांची चर्चा, इच्छुकांच्या मुलाखती असे प्रकार महाविकास आघाडीत सुरू झाले आहेत. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविली जाईल, अशी चर्चा तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असली तरी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तरी घोषणा न झाल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून भारतीय जनता पक्षाविरोधात निवडणूक लढतील, अशी चर्चा सुरू झाली. या तिन्ही पक्षांच्या शहर पातळीवरील तिन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून तसे सांगण्यात आले. मात्र महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविण्याची आणि या मतदार संघातून भाजपला कोण आव्हान देणार याचा निर्णय अद्यापही झालेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून दावे-प्रतिदावे करत एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्न सुरू झाले आहेत.
Home Maharashtra जागा एक, दावेदार अनेक… कसब्याच्या जागेवरुन मविआमध्ये संघर्ष, तिन्ही पक्षांनी शड्डू ठोकला