औरंगाबाद : कुटुंबियांचा विरोध झुगारून पळून जात लग्न केलेल्या २१ वर्षीय नवविवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वाळूज औद्योगिक परिसरात समोर आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. अंजली रोहित आव्हाड (वय- २१ वर्षे, रा. बजाजनगर, औरंगाबाद) असं गळफास घेतलेल्या विवाहितेचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, अंजलीच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. त्यामुळे आई कंपनीत काम करून उदरनिर्वाह करत होती. घराला हातभार लागेल म्हणून अंजली देखील खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये काम करून आईला आर्थिक हातभार लावायची. याच दरम्यान अंजलीची ओळख रोहित याच्यासोबत झाली आणि पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र घरच्यांचा विरोध असल्याने शेवटी दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. ९ नोव्हेंबर रोजी दोघांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे लग्न केले.

प्रेयसी फोन उचलत नाही म्हणून प्रियकर तापला, रस्त्यात गाठलं अन् विषारी औषध पाजलं

काही दिवस तेथे राहिल्यावर पुन्हा दोघेही औरंगाबादमधील बजाजनगर येथे राहायला आले. दरम्यान काही दिवसांपासून अंजलीचे पती आणि सासूमध्ये या ना त्या कारणाने खटके उडत होते. दरम्यान शनिवारी पुन्हा कुरबूर झाली. त्यानंतर अंजलीने थेट पोलीस ठाणे गाठले. तेथे पोलिसांनी दोन्ही परिवाराचे समुपदेशन केले. त्यानंतर अंजली सासरी न जाता आईसह माहेरी गेली.

दरम्यान नित्याप्रमाणे आई सकाळी कंपनीत कामाला गेली. दुपारी आईने अंजलीला अनेक कॉल केले, मात्र अंजली कॉल उचलत नसल्याने आईने शेजाऱ्यांना बघायला सांगितले. शेजाऱ्यांनी घराच्या फटीमधून पाहिले असता अंजलीने गळफास घेतल्याचे आढळून आले. याबाबत शेजाऱ्यांनी आईला घटनेची माहिती देत पोलिसांना पाचारण केले. तसंच अंजलीला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यातच अंजलीने जगाचा निरोप घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here