Maharashtra Politics | आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वीच शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प मोदी सरकारने संसदेत सादर केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक नव्या योजनांची घोषणा केली. मात्र, यामध्ये महाराष्ट्र आणि मुंबईच्या वाट्याला काहीच आले नाही. याच मुद्द्यावरुन आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. हा एकप्रकारे महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.

हायलाइट्स:
- गुजरातमध्ये विजय मिळाल्याने अर्थसंकल्पात झुकते माप
- अर्थसंकल्पात महाराष्ट्र किंवा मुंबईचा उल्लेख नाही
यावेळी आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्प हा महिला वर्ग, तरुण अशा सर्वांचीच निराशा करणारा असल्याची टीका केली. ज्या राज्यात आताच निवडणुका होऊ गेल्या, मोठ्या संख्येने म्हणजे १५० पेक्षा अधिक जागांवर भाजपला विजय मिळाला, त्या राज्यासाठी अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातून वेदांता-फॉक्सकॉन, एअरबस प्रकल्प गुजरातला नेण्यात आले. वित्तीय केंद्र तिकडे नेण्यात आले, त्यांना अधिक सवलती देण्यात आल्या. महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प गुजरातला नेले. तरीही ज्या महाराष्ट्रातून उद्योग अन्यत्र गेले त्यांना काहीच मिळाले नाही. हा महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. कर्नाटकमध्येही निवडणुका होऊ घातल्या आहेत. एक्झिट पोल्समध्ये त्याठिकाणी भाजपला जास्त जागा मिळताना दिसत नाहीत. त्यामुळे अर्थसंकल्पात कर्नाटकसाठी खर्च करण्यात आला आहे. पण अर्थसंकल्पात महाराष्ट्र किंवा मुंबईचा उल्लेख नाही. महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार असूनही राज्याला काहीच मिळाले नाही. हा मुंबई आणि महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवण्याचा प्रकार आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला अर्थसंकल्पात काहीच आलं नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले. यावर आता भाजपचे नेते काय प्रत्युत्तर देतात, हे पाहावे लागेल.
अमृतकाळातील सर्वजनहिताय अर्थसंकल्प : देवेंद्र फडणवीस
केंद्रीय अर्थसंकल्पातून शेवटच्या व्यक्तीचा, शेतकरी, आदिवासी, महिला, युवा, मध्यमवर्गीय अशा सर्वच घटकांचा विचार करण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवापासून प्रारंभ झालेल्या ‘देशाच्या अमृतकाळातील सर्वजनहिताय’ असा हा केंद्रीय अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा अर्थसंकल्प: किसान सभा
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीमालाला दीडपट भावाचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. अर्थसंकल्पात याबाबत पाळलेले मौन शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारे असल्याची प्रतिक्रिया किसान सभेकडून व्यक्त करण्यात आली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.