मुंबई: मुख्यमंत्री यांनी शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीची ‘तरुण भारत’ (नागपूर) या वृत्तपत्रातून खिल्ली उडवण्यात आली आहे. ‘उद्धव यांची ही मुलाखत खदखदून हसवणारी होती. या मुलाखतीच्या आडून भावाला मंत्रिपद न मिळाल्याचा सूडच संजय राऊत यांनी उद्धव यांच्यावर उगवला,’ अशी घणाघाती टीका करण्यात आली आहे.

नागपूर येथून प्रकाशित होणारे ‘तरुण भारत’ हे दैनिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी वैचारिक नाते सांगणारे आहे. आठ महिन्यांपूर्वी भाजप-शिवसेनेमध्ये दुरावा आल्यानंतर ‘तरुण भारत’नं सातत्यानं भाजपची भूमिका मांडण्याचं काम केलं होतं. एरवीही ‘तरुण भारत’मधून भाजपवरील टीकेला उत्तर दिलं जातं. या वृत्तपत्राचे सहयोगी संपादक श्रीनिवास वैद्य यांनी आजच्या लेखातून उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर भाष्य केलं आहे. ‘खळबळजनक अशी जाहिरात केलेली ही मुलाखत प्रत्यक्षात उद्धव ठाकरे यांची टिंगलटवाळी करणारी ठरली. आरशासमोर बसून मुख्यमंत्री आपलं प्रतिबिंब पाहताहेत असं वाटत होतं. ही मुलाखत पाहून अस्सल शिवसैनिकांनी दारे-खिडक्या बंद करून आपली डोकी भिंतीवर आपटून घेतली असतील,’ असा जोरदार टोलाही लगावण्यात आला आहे.

मुलाखतीत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाइव्हचं कौतुक केलं होतं. ‘राज्याचे मुख्यमंत्री जागतिक आरोग्य संघटनेला मार्गदर्शन करताहेत असं फेसबुक लाइव्ह पाहताना वाटत होतं. हे ज्ञान तुम्ही कुठून मिळवलं’, असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला होता. हा प्रश्न विचारून संजय राऊत यांनी ठरवून उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणले, असा आरोप लेखातून करण्यात आला आहे.

हेही वाचा:

संजय राऊत यांच्यावरही लेखातून तोफ डागण्यात आली आहे. ठाकरे कुटुंबीयांच्या कृपेनं संपादक व खासदार झालेली व्यक्ती जेव्हा त्या कुटुंबप्रमुखाची मुलाखत घेईल, तेव्हा ते स्तोत्र असणे स्वाभाविक आहे. पण ही मुलाखत त्यापुढं जाऊन लाळघोटेपणाचा नवा नीचांक प्रस्थापित करणारी ठरली. संजय राऊत यांच्या प्रश्नांची उत्तरं देताना मुख्यमंत्र्यांनाही काही वाटलं नाही, हे देखील आश्चर्य आहे. करोनासारख्या संवेदनशील मुद्द्यावर भारतातील नामवंत डॉक्टरांचे ज्ञान आपल्यापुढे तोकडे आहे हे मुख्यमंत्र्यांनी मान्य करणे म्हणजे हद्दच झाली. देशातील समस्त डॉक्टरांचा हा अपमान आहे. महाराष्ट्रातील जनतेला मान खाली घालायची वेळ आली आहे. असा मुख्यमंत्री महाराष्ट्रानेच काय, पण भारतानेही पाहिला नसेल आणि तो कुणाच्याही नशिबी येऊ नये,’ अशी बोचरी टीका लेखातून करण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here