म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाचे काम महापालिकेकडून प्रगतिपथावर आहे. या कामाला अधिकाधिक गती द्यावी, तसेच यंदाच्या पावसाळ्यापूर्वी ३१ मेपर्यंत दोन मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे निर्देश पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

गोखले पुलाच्या कामात पालिकेसोबत रेल्वे प्रशासनही सहभागी आहे. रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या पुलाच्या भागाचे पाडकाम मागील दोन महिन्यांत ८०पैकी ३० मीटर इतकेच रेल्वे कंत्राटदाराने पूर्ण केले आहे. पूल पूर्ण पाडून झाल्यानंतर पालिकेला उर्वरित कामाला वेग देता येणे शक्य होईल. त्या दृष्टीने कार्यवाही होण्यासाठी ७ फेब्रुवारीला पालिका आणि रेल्वे यांची संयुक्त बैठक पालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

कॅन्सरसह अनेक आजारांसाठी मोठी रुग्णालये उभारणार; कसा असेल यंदा BMC चा अर्थसंकल्प?

या उड्डाणपुलाच्या उत्तरेकडील रस्त्याचे ७० टक्के काम पालिकेने पूर्ण केले आहे, तर दक्षिणेकडील बाजूच्या पुलाचे पाडकाम करण्यासाठी रेल्वेला आवश्यक असल्याने अद्याप या भागाकडे काम सुरू करता आलेले नाही. पुलाच्या पुनर्बांधणीसाठी पालिकेने सादर केलेल्या संकल्पना आराखड्याला रेल्वेने १ जानेवारीला मंजुरी दिली आहे. या मंजूर आराखड्यानुसार ते काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here