nashik graduate constituency Election 2023 | बाळासाहेब थोरात यांनी मला बजावलं होतं की, आपल्याला काँग्रेसकडूनच लढायचे आहे. त्यांन मला एच.के. पाटलांशी बोलायला सांगितले. पण त्यांनी माझे फोन उचलले नाहीत.

हायलाइट्स:
- पक्ष काही देत नव्हता म्हणून वडिलांनी माझ्यासाठी जागा सोडली
- नाना पटोलेंनी माझ्या माणसाला १० तास ऑफिसमध्ये बसवून ठेवलं
- भाजपशी संधान बांधल्याचे खोटे आरोप
नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीबाबत काँग्रेसमधील प्रदेश कार्यालयातील नेत्यांनी हेतुपरस्सर गोंधळ घालून मला कशाप्रकारे उमेदवारी मिळवून दिली नाही, याबाबत सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषदेत सविस्तरपणे आपली बाजू मांडली. मला स्वत:च्या कर्तृत्वावर काहीतरी करून दाखवायचे होते. त्यासाठी मी महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे मला संधी देण्याविषयी बोललो होतो. तेव्हा त्यांच्याकडून मला तू वडिलांच्या जागेवरुन उभा राहा, असा सल्ला देण्यात आला. हा सल्ला ऐकून मला संताप आला होता. मात्र, नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जवळ आल्यानंतर माझे वडील सुधीर तांबे यांनीच मला निवडणुकीला उभे राहण्याचा आग्रह धरला. मी त्यासाठी राजी नव्हतो. अखेर बाळासाहेब थोरात आणि तांबे कुटुंबीयांशी चर्चा करुन मी निवडणुकीला उभा राहणार, असे ठरले. परंतु, मी त्याबाबत साशंक असल्याने नाशिक पदवीधर मतदारसंघात कोण उभे राहणार, याचा निर्णय आम्ही शेवटच्या क्षणी घेऊ, असे आम्ही एच. के. पाटील यांनी कळवले होते. पण त्यानंतर एखाद्या स्क्रिप्टनुसार घडामोडी घडत गेल्या आणि मला काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरण्यापासून दूर ठेवण्यात आले, असा आरोप सत्यजी तांबे यांनी केला.
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नेमकं काय घडलं?
सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषदेत नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याआधीचा घटनाक्रम सांगितला. निवडणुकीचा अर्ज भरण्याचा १२ जानेवारी हा शेवटचा दिवस होता. त्याच्या दोन दिवस आधी माझा माणूस नागपूरला प्रदेश कार्यालयात गेला होता. आम्ही कोरे एबी फॉर्म देण्याविषयी नाना पटोले यांच्याशी चर्चा केली होती. माझा माणसून १० जानेवारीला सकाळपासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत प्रदेश कार्यालयात बसून राहिला. त्यानंतर नाना पटोले यांनी त्याच्याकडे सीलबंद लिफाफ्यात दोन एबी फॉर्म देत असल्याचे सांगितले. हे एबी फॉर्म घेऊन माणसू ११ जानेवारीला नाशिकमध्ये पोहोचला. त्यानंतर आम्ही उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात केली. त्यासाठी आम्ही लिफाफा फोडला तेव्हा त्यामध्ये चुकीचे एबी फॉर्म होते. एक कोरा एबी फॉर्म हा नागपूर शिक्षक मतदारसंघ आणि दुसरा एबी फॉर्म औरंगाबाद मतदारसंघाचा होता. याबाबत आम्ही प्रदेश कार्यालयाला कळवले तेव्हा नवा एबी फॉर्म पाठवण्यात आला. त्यावर डॉ. सुधीर तांबे यांचे नाव लिहले होते. तर दुसऱ्या उमेदवाराच्या रकान्यात NIL असे लिहले होते, जेणेकरुन त्याठिकाणी माझे नाव लिहता येऊ नये. हे सगळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी घडत होते. त्यावेळी मी एच. के. पाटील यांना फोन केले, परंतु, त्यांनी माझा एकही फोन उचलला नाही. तर नाना पटोले यांचा फोन बंद होता. त्यामुळे मी इंडियन नॅशनल काँग्रेसच्या नावाने फॉर्म भरला, पण एबी फॉर्म नसल्याने तो अपक्ष म्हणून कन्व्हर्ट झाला, अशा खुलासा सत्यजीत तांबे यांनी केला.
या सगळ्याची स्क्रिप्ट आधीच लिहली होती. एबी फॉर्मबाबत ठरवून गोंधळ घालण्यात आला. माझ्या वडिलांनी निवडणूक लढणार नसल्याचे सांगितले होते. तरीही शेवटच्या दिवशी १२.३० वाजता दिल्लीतून माझ्या वडिलांचे नाव जाहीर करण्यात आले. विधानपरिषदेच्या इतर कोणत्याही उमेदवाराचे नाव दिल्लीतून जाहीर झाले नव्हते. मग ही एकच उमेदवारी दिल्लीतून का जाहीर झाली?, असा सवाल सत्यजीत तांबे यांनी विचारला. हे सर्व बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी आणि तांबे परिवाला काँग्रेसबाहेर ढकलण्यासाठी रचलेले कारस्थान होते, असे सत्यजीत तांबे यांनी म्हटले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.