पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भाषणानंतर राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी म्हटले की, माझ्या आरोपांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी शॉकमध्ये गेले असावेत. त्यांनी मी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. मी त्यांना कोणतेही किचकट प्रश्न विचारले नव्हते. तुम्ही गौतम अदानी यांच्यासोबत कितीवेळा गेला आहात? त्यांना कितीवेळा भेटलात? माझे हे प्रश्न अत्यंत साधे होते. पण पंतप्रधान मोदी यांनी त्यावर उत्तर दिले नाही. यावर मी समाधानी नाही. परंतु, पंतप्रधानांच्या भाषणामुळे सत्य उघड झाले आहे. अदानी समूहावरील आरोपांच्या चौकशीबाबत ते काहीच बोलले नाहीत. संरक्षण खात्यातील बनावट कंपन्या आणि बेनामी पैशांबाबत मोदी काही बोलले नाहीत. यावरुन एक स्पष्ट होतेय की, पंतप्रधान मोदी अदानी यांना वाचवत आहेत, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
राहुल गांधींनी आपल्या भाषणात काय आरोप केले होते?
हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर शेअर मार्केटमध्ये अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांचे समभाग गडगडले होते. त्यामुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली होती. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मंगळवारी लोकसभेत केलेल्या भाषणात अदानी समूहाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. भारत जोडो यात्रेदरम्यान मला अनेक लोक येऊन भेटत होते. तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटकमध्ये अदानी हे नाव सर्वत्र ऐकायला मिळाले. प्रत्येकजण हेच विचारत होता की, अदानी यांना प्रत्येक क्षेत्रात प्राधान्य आणि हमखास यश कसे मिळते. राहुल गांधी यांनी भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचा विमान प्रवासातील फोटो दाखवला होता. त्यामुळे पंतप्रधान मोदी आज अदानींच्या मुद्द्यावरुन प्रतिवाद करतील, अशी अपेक्षा होती. परंतु, मोदींनी आपल्या भाषणात अदानी यांच्याबाबत एकही शब्द उच्चारला नाही.
काँग्रेस पक्षाच्या पतनाबाबत मोदींची खोचक टीका
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात हार्वर्ड विद्यापीठातील एका रिसर्चचा दाखला दिला. हार्वर्ड विद्यापीठात अलीकडेच’राईज अँड डिक्लाईन ऑफ इंडियाज काँग्रेस पार्टी’, असा विषय घेऊन अभ्यास करण्यात आला. मला विश्वास आहे की, भविष्यात काँग्रेस पक्षाच्या पतनाबाबत हार्वर्ड नव्हे तर जगातील अनेक नामांकित विद्यापीठे अभ्यास करतील. काँग्रेस पक्ष बुडवणाऱ्या लोकांचाही अभ्यास केला जाईल, अशी खोचक टिप्पणी मोदींनी केली.