Authored by विजयसिंह होलम | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 9 Feb 2023, 6:18 pm
cooperative sector and institutions in Maharashtra | ग्रामीण भागातील सहकारी संस्थांचे जाळे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची खरी ताकद मानली जाते. या सहकारी संस्थांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात आपला वचक टिकवून ठेवला आहे.

हायलाइट्स:
- नव्या सहकारी संस्थाची मान्यता थेट मंत्रालयातून देण्यात येईल
- नव्या सहकारी संस्थांच्या नोंदणीचे काम सुरु
- अनेक बंद पडलेले साखर कारखाने भाजप ताब्यात घेत आहे
मंत्री अतुल सावे आज नगर शहराच्या दौऱ्यावर आले होते. भाजपच्या कार्यालयात त्यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी मंत्री सावे यांचे स्वागत केले. भाजपचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर, वसंत लोढा, संघटन सरचिटणीस विवेक नाईक, सुवेंद्र गांधी, तुषार पोटे, महेश नामदे यावेळी उपस्थित होते.
यावेळी मंत्री सावे म्हणाले, राज्यात सत्तांतर झाले त्यावेळी अनपेक्षितपणे देवेंद्र फडणवीस यांनी सहकार सारख्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी मला दिली. भारतीय जनता पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देणारा पक्ष आहे. राज्यात सहकार क्षेत्रात भारतीय जनता पार्टी मागे आहे. त्यामुळे आता राज्यात मोठ्या प्रमाणात पक्ष सहकार क्षेत्रात सक्रिय होत अनेक बंद पडलेले साखर कारखाने ताब्यात घेत आहे. अनेक वर्षापासून सहकार संस्थांची नव्याने नोंदणी बंद होती. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना सहकारामध्ये प्रवेश मिळत नव्हता. म्हणून हे सरकार ही बंदी उठवत असून स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षाची शिफारसीने नव्या सहकारी संस्थांना मंजुरी मिळणार आहे.
प्रत्येक गावात सहकारी सोसायटी सुरु करण्यास पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा. पूर्वीच्या अटल अर्थ सहाय्य योजना प्रमाणे हे काम चालणार आहे. तसेच ज्या कार्यकर्त्यांना सहकरी बँकांचे सभासद व्हायचे आहे त्यांनी माझ्याकडे यावे. मी संबंधित बँकेला भाजपच्या कार्यकर्त्याला सभासदत्व देण्यास सांगतो. सहकार क्षेत्रात भाजपाचे काम भविष्यात वाढणार आहे. सहकार क्षेत्र भ्रष्टाचाराने बरबटले होते. ते स्वच्छ करण्याचे काम केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा करत आहेत. तेच काम राज्यातही सुरु आहे. लवकरच सर्व सहकारी संस्थांचे कामे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. राज्य सरकारने ओबीसी समाजासाठी खूप महत्वाचे निर्णय घेत समाजास न्याय देत आहे, असेही अतुल सावे यांनी सांगितले. महेंद्र गंधे म्हणाले, सर्वसामान्य कार्यकर्ता असलेले अतुल सावे यांनी पक्षाचे एकनिष्ठेने काम केल्याने देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर खूप मोठा विश्वास टाकला आहे. पारदर्शी व स्वच्छ कारभार करत मंत्री सावे राज्यातील सहकार क्षेत्र स्वच्छ कर आहेत. कार्यकर्त्यांनी त्यांच्या कामाचा आदर्श घ्यावा. यावेळी वसंत राठोड, नरेंद्र कुलकर्णी, तायगा शिंदे, गोकुळ काळे यांनी समस्या मांडल्या.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.