जळगाव : पुतणीच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून दुसऱ्या एका नातेवाईकाकडे जात असलेल्या काकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुकदेव जनार्दन तायडे (वय ५५, रा. कानसवाडा ता.जळगाव) असं मयत व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास वरणगाव शहरातील आराधना हॉटेलसमोर हा अपघात झाला. वरणगाव येथील महर्षी वाल्मिक नगरात गुरुवारी सुकदेव तायडे यांच्या लहान भावाची मुलगी म्हणजेच पुतणी हिचा हळदीचा कार्यक्रम होता. तर शुक्रवारी तिचा विवाह सोहळा होता. यासाठी सुकदेव जनार्दन तायडे हे जळगाव तालुक्यातील कानसवाडा येथून त्यांची दुचाकी क्रमांक. एएच १९ सीके ९३३० या दुचाकीने सहकुटूंब वरणगाव येथे आले होते. त्यानंतर हळदीचा कार्यक्रम आटोपून गुरुवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास सुकदेव तायडे हे वरणगाव या गावापासून काही अंतरावर असलेल्या भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील नातेवाईकाकडे जात होते . यादरम्यान वरणगाव शहरातील आराधना हॉटेलजवळ सुकदेव तायडे यांच्या दुचाकीने एका पायी चालणाऱ्या व्यक्तीला धडक दिली. त्यानंतर भरधाव वेगात असणारी त्यांची दुचाकी समोर असलेल्या लिंबाच्या झाडावर जाऊन आदळली. या घटनेत गंभीर जखमी सुकदेव तायडे यांना वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयत हलविण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. क्षितीजा हेडवे यांनी त्यांना मयत घोषित केलं. या प्रकरणी भीला शांताराम कोळी यांनी दिलेल्या खबरीवरुन वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुकदेव तायडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.