रत्नागिरी : घरची परिस्थिती अत्यंत बेताची, मातीचे घर, याही परिस्थितीत आपली वृद्ध आई, आणि आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या मुलाची जबाबदारी पेलणारा शशिकांत वारिशे हा कुटुंबातील एकमेव कमवता आधार होता. मात्र संशयित आरोपी आंबेरकरने कुटुंबावरील छत्र कायमचे हिरावून घेतले आहे. आपल्या लेकाचं शिक्षण पूर्ण करुन देण्याचं स्वप्न पाहणारे पत्रकार शशिकांत वारिशे यांची सोमवारी हत्या करण्यात आली. रिफायनरी समर्थक असलेल्या पंढरीनाथ आंबेरकर याने महिंद्र थार जीपने वारिशेंची दुचाकी उडवून जीव घेतल्याचा आरोप आहे. या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल राज्य व राष्ट्रीय स्तरावरील मीडियानेही घेतली आहे, पण आता प्रश्न उरतो की शशिकांत वारीशे याचा असलेला एकुलता एक मुलगा यशची जबाबदारी कोण घेणार?

रत्नागिरी येथे आयटीआय शिकून इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहत असतानाच यशच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हिरावून घेण्यात आले आहे. आता या कुटुंबाचा कमावता आधारच गेला आहे. शशिकांत यांच्या पश्चात घरी आता त्यांची वयोवृद्ध आई व मुलगा यश असे दोघेच असल्याने आता या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या कुटुंबाला आर्थिक मदतीसाठी दात्यांनी हात पुढे करणे आवश्यक आहे.

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पत्रकार हा नेहमीच शासनाच्या योजना, भूमिका मांडत असतो. तसंच विरोधी पक्षाच्याही भूमिका आणि बातम्या देण्याचं काम हे पत्रकार नेहमीच करत असतात. समाजातील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम पत्रकार करत असतात. पण आता या सगळ्या दुर्दैवी घटनेनंतर शासन यांच्या या कुटुंबाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहील का? त्याला तात्काळ आर्थिक मदत शासन स्तरावरून देण्यात येईल का? हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.

राजकीय आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण आता या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उरतो, तो शशिकांत यांच्या मुलाची म्हणजेच यशच्या शिक्षणाची जबाबदारी व त्याला सरकारी नोकरीत सामावून घेण्याची जबाबदारी ही शासन घेईल का? किंवा यासाठी काय करता येईल याचा विचार तातडीने करणे आवश्यक आहे. माझ्या बाबांना मारुन टाकलं आता हे लोक आम्हालाही मारतील अशी भीतीही त्याला वाटते.

शशिकांत यांच्या घरची परिस्थिती पाहून या कुटुंबाला भेटायला जात असलेले राजकारणी, पत्रकार यांचं मन अक्षरशः सुन्न होते. आज शनिवारी या हत्येच्या विरोधात रिफायनरी विरोधी संघटनेने राजापुरात जोरदार मोर्चा काढला होता व या मोर्चाला मिळालेला प्रतिसाद हा प्रचंड संख्येने असाच होता. कोकणात होऊ घातलेला हा रिफायनरी प्रकल्प होईल किंवा नाही हे येणारा काळ व शासन ठरवेल मात्र या सगळ्यात एका पत्रकाराचा बळी गेला आहे, हा काळा इतिहास आता कधीच पुसला जाणार नाही. त्यामुळे आता वारीशे यांची हत्या करणारा जरी सध्या तुरुंगात असला, तरी एका वारीशेची हत्या झाली आहे, आता पुढचा वारिशे कोण होणार, याची वाट न पाहता शासनाने खंबीर व ठाम भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पत्रकारांकडे पुन्हा वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत कोणीही करणार नाही, असे कठोर शासन जर का संशयित आरोपीला झालं, तरच तो त्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने न्याय असेल.
ज्याला जीव लावला, त्या बैलानेच जीव घेतला; शर्ट बदलल्याने घात झाला, कोकणात हळहळ
दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेऊन एसआयटी चौकशी नेमल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता ही चौकशी होईलच अन्य कोणी दोषी आढळल्यास त्यावरही कायदेशीर कारवाई होईल. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर शशिकांत वारीशे यांच्या कुटुंबावर आता ओढवलेली परिस्थिती ही खूपच चिंताजनक आहे. हे भयाण वास्तव नजरेआड करताच येणार नाही. त्यांच्या मुलाचा व आईचा टाहो अनेकांच्या डोळ्यासमोरून हलत नाही.

बैल अंगावर पडल्याने गुदमरला, मुक्या प्राण्यांना जीव लावणाऱ्या तरुणाची चटका लावणारी एक्झिट
शशिकांत यांचा मुलगा यश आता आठवण काढताना सांगत होता ‘बाबा मला नेहमी फोन करायचे, यश गाडी स्लो घेऊन जा आयटीआयला जा, गेलास की मला फोन कर, ते माझी खूप नेहमी काळजी करायचे’ असं सांगताना आपल्या पत्रकार बाबाच्या आठवणीने त्याने फोडलेला टाहो हृदय पिळवटून टाकतो. एका मातेने लेकासाठी फोडलेला हंबरडा हा काळीज चिरून टाकणारा आहे. या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी, आर्थिक भार उचलून यशला पुढे शासकीय सेवेत सामावून घेता येईल का, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याच्या आजीवर वेळेत औषधोपचार करण्यासाठी आता या कुटुंबाला गरज आहे ती भक्कमपणे सामाजिक व आर्थिक आधार देण्याची.

आरोपीला फाशी होणारच, खासदार विनायक राऊतांचा शशिकांत वारिशेंच्या आईला शब्द

Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here