आर्थिक अडचणीमुळं कापूस विक्री करण्याची वेळ
कापसाला मिळणाऱ्या कमी दरामुळं शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. दुसरीकडे साठवलेल्या कापसाच्यामुळे आरोग्य ही धोक्यात आल्यानं शेतकरी दुहेरी अडचणीत सापडलेला आहे. मार्च महिन्यापूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक व्यवहार पूर्ण करावे लागतात. गतवर्षी घेतलेलं पीक कर्ज देखील परत द्यावं लागतं. काही शेतकऱ्यांच्या कुटुंबांमध्ये लग्न कार्य आणि इतर कारणांमुळं पैशाची गरज असते. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न देखील शेतकऱ्यांना भेडसावत आहे त्यामुळं कापूस विक्रीतून चांगले पैसे मिळतील या आशेपोटी पांढऱ्या सोन्याचा साठा करण्या शेतकऱ्यांना आता मिळेल त्या दरानं कापूस विकावा लागत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
कापूस विक्रीबाबत बुलढाणा जिल्ह्यातील रोहणा येथील शेतकरी वामन वरुळकर सांगतात, “गतवर्षी कापसाच्या भावाने १२ हजारांचा टप्पा पार केला होता. त्यामुळे या वर्षी देखील असाच भाव मिळेल अशी अपेक्षा असल्याने आतापर्यंत कापसाची विक्री केली नाही. मात्र, भाव वाढत नसल्याने आणि पैशांची चणचण मुला-मुलींचे लग्न शिक्षण, शेतावरील कर्ज सोबत घरात कापूस साठवल्यानं निर्माण होणाऱ्या समस्यांमुळं शेतकऱ्यांच्या मनात मिळेल त्या दरात कापूस विक्री करण्याचा विचार असल्याचं शेतकरी वामन वारुळकर यांनी सांगितले.
कापसाचे वायदे उद्यापासून सुरु होणार
कापसाचे वायदे सुरु व्हावेत म्हणून शेतकऱ्यांनी मुंबईत सेबीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं होतं. शेतकऱ्यांच्या लढ्याला यश मिळालं असून उद्यापासून कापसाचे वायदे सुरु होणार आहेत. त्यामुळं कापसाला चांगला दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कापूस उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या देखील तयारीत आहेत.