प्रभाकरनच्या कुटुंबातील सदस्यांच्या सहमतीनं ही माहिती सार्वजनिक करत असल्याचं नेदुमारन म्हणाले. प्रभाकरन हे जिवंत असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचं दावा त्यांनी केला. प्रभाकरन लवकरच समोर येईल आणि तामिळ लोकांच्या चांगल्या जीवनासाठी नवी घोषणा करेल, असं नेदुमारन म्हणाले.
प्रभाकरन समोर येण्याची योग्य वेळ : नेदुमारन
तंजावूरमध्ये मुलिवैक्कल मेमोरियलमध्ये माध्यमांशी बोलताना नेदुमारन यांनी सध्याची आंतरराष्ट्रीय स्थिती आणि श्रीलंकेतील राजपक्षे सरकारविरोधातील आंदोलनामुळं प्रभाकरन समोर येण्याची योग्य वेळ असल्याचं नेदुमारन म्हणाले. जगभरातील श्रीलंकन तामिळ आणि तामिळ व्यक्तींनी प्रभाकरनला समर्थन देण्यासाठी एकत्र रहावं, असं नेदुमारन म्हणाले. तामिळनाडू सरकार, राजकीय पक्ष आणि जनतेनं प्रभाकरनच्या समर्थनार्थ उभ राहावं, असं आव्हान नेदुमारन यांनी केलं.
नेदुमारन यांनी ते प्रभाकरन यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात होते, असा दावा केला आहे. प्रभाकरन यांची प्रकृती चांगली असल्याचा दावा त्यांनी केला. प्रभाकरन जिंवत असल्याची माहिती सार्वजनिक करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांसह त्याची परवानगी घेतल्याचं नेदुमारन म्हणाले.
नेदुमारन यांच्या दाव्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. १८ मे २००९ ला प्रभाकरनचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती. प्रभाकरनचे सहकारी त्याला द तामिळ टायगर म्हणायचे. प्रभाकरन सैन्य दलानं केलेल्या गोळीबारात मारला गेल्याचं सांगण्यात आलं होतं. श्रीलंकेतील जाफना क्षेत्र दहशतमुक्त झाला होता. प्रभाकरनच्या मृत्यूनंतर लिट्टेनं शांततेचा मार्ग स्वीकारला होता.
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येमध्ये देखील लिट्टेचं नाव आलं होतं. लिट्टे ही श्रीलंकेतील दहशतावादी संघटना होती. ती वेगळ्या देशाची मागणी करत होती. श्रीलंका आणि भारतातील अनेक नेत्यांची त्यांनी हत्या केली होती. ८० च्या दशकानंतर लिट्टेला बळ मिळालं होतं. श्रीलंकेत निर्माण झालेल्या गृहयुद्धाला लिट्टे संघटना जबाबदार होती. १९८७ मध्ये भारत आणि श्रीलंकेत शांती करार झाला होता. भारतानं लिट्टे विरोधात श्रीलंकेत सैन्य पाठवलं होतं. त्यामुळं लिट्टेनं बदला घेण्याचं ठरवलं होतं. २ मे १९९२ रोजी लिट्टेनं केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात राजीव गांधी यांचा मृत्यू झाला होता.