ठाणे: राज्यातील रुग्ण वाढीची वेगवेगळी कारणं सांगितली जात असली तरी आता या करोना वाढीचं खापर फेरीवाल्यांवर फोडलं जात आहे. नालासोपाऱ्याच्या तुळींज पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने पालिका आयुक्तांना पत्र लिहून बेकायदेशीर फेरीवाल्यांमुळेच करोनाचा संसर्ग वाढल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डीएस पाटील यांनी पालिका आयुक्त गंगाधरन डी यांना पत्र लिहून हा दावा केला आहे. तुळींज पोलीस ठाण्याचा परिसर हा गर्दीचा परिसर आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर फेरीवाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस ठाण्याच्या चारही बाजूला या अनिधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान बसवले आहे. फेरीवाल्यांच्या बजबजपुरीमुळे या परिसरातून गाडीच काय पायी चालणंही मुश्किल होऊन गेलेलं आहे. या फेरीवाल्यांबद्दल स्थानिकांनी अनेकदा तक्रारी केल्या. पालिकेनेही अनेकदा कारवाई केली. पण फेरीवाले पुन्हा आहे त्याच जागी येऊन बसत असल्याने पालिकेचीही डोकेदुखी वाढली आहे. राज्यात करोनाचं संकट असतानाही अनेक बेकायदेशीर फेरीवाले नालासोपार परिसरात बेकायदेशीर सामानांची विक्री करत आहेत.

संध्याकाळी या परिसरात फेरीवाल्यांची मोठी गर्दी होत असून नागरिकही खरेदीसाठी बाहेर पडत आहे. त्यामुळे या फेरीवाल्यांमुळे करोनाचा संसर्ग वाढला असून अजूनही संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या फेरीवाल्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि सदर परिसर फेरीवाला मुक्त करावा, अशी मागणी पाटील यांनी या पत्रातून केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, वसई-विरार महापालिका क्षेत्रात काल २१५ नवे करोनाबाधित सापडले असून ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात करोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असून हे प्रमाण ५९.८४ टक्के एवढे झाले आहे. काल देखील ७४७८ रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३९ हजार ७५५ झाली आहे.आज ९२११ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४६ हजार १२९ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. तर, काल धारावीत फक्त दोन रुग्णांची नोंद झाली आहे. माहिम परिसरात २५ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी धारावी हा करोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. मात्र, महापालिका आणि स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नांमुळं धारावी करोनामुक्त करण्यास यश हाती आलं आहे. धारावीच्या या पॅटर्नचं कौतुक केंद्र सरकारनंही केलं आहे. बुधवारी हाती आलेल्या आकडेवारीनुसार धारावीत आता ८३ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. तर एकूण २ हजार ५४५ एकूण रुग्ण आहेत. आत्तापर्यंत २ हजार २१२ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात करुन सुखरुप घरी परतले आहे. धारावीत करोनाचा विळखा सैल होत असल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here