वाशिम जिल्ह्यातील इतर बाजारपेठेमध्ये सुद्धा तुरीच्या दरात २००ते २५० रुपयांची वाढ बघायला मिळाली.
तुरीच्या वाढलेल्या दराबाबत वाशिम बाजार समितीतील अडते प्रकाश काठोळे यांनी सांगितले की, देशात सध्या तुरीचे उत्पादन घटले असून सरकारने विदेशातून तुर आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तरीही स्थानिक व्यापाऱ्यांची देशातीलच तुरीला पसंती असल्यामुळे भविष्यातील आणखी दरवाढीच्या अपेक्षेने ते साठा करून ठेवत आहेत. त्यामुळे बाजारात सध्या तुरीची मागणी वाढली आहे. चांगले दर मिळत असल्याने शेतकरी सुद्धा खुश आहेत, असं ते म्हणाले.
आम्ही सोयाबीन मध्ये सात एकर क्षेत्रावर तुरीची लागवड केली होती. सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे बरीच तूर ही जळाली होती व नंतरही ऐन फुलोऱ्यात धुक्यामुळे तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली. एकरी सहा ते सात क्विंटल तूर होईल अशी अपेक्षा होती. मात्र, एकरी पाच क्विंटलचे उत्पादन मिळाले. सध्या चांगले दर मिळत असल्याने आज तूर विक्रीसाठी आणली होती. तुरीच्या दराबाबत मी समाधानी आहे, असं शेतकरी खुशाल सरनाईक यांनी सांगितले.
सोयाबीनचे दर मात्र स्थिर
एकीकडे तुरीच्या दरात सातत्याने वाढ होत असताना ज्या पिकाकडून शेतकऱ्यांना सर्वात जास्त अपेक्षा होती त्या सोयाबीनच्या बाबतीत मात्र मोठी निराशा होत आहे. सध्या सोयाबीनचे दर ५२०० च्या आसपास स्थिर झाले आहेत. वाशिमच्या बाजारात आज सोयाबीनला किमान ४८६० ते कमाल ५२६० रुपये इतका दर मिळाला आहे. दर कमी मिळत असल्याने बाजारात आवकही कमी झाली आहे. आज वाशिम च्या बाजारात फक्त २८८८ क्विंटल सोयाबीनची आवक झाली.