औरंगाबाद : बारावं ज्योतिर्लिंग म्हणून जगभर प्रसिद्ध असलेलं औरंगाबाद जिल्ह्यातील घृष्णेश्वर मंदिर हे शेवटचं ज्योतिर्लिंग आहे. या नंतर ज्योतिर्लिंग कुठेही प्रकट झालं नसल्याने या ठिकाणाला पूर्णस्थान म्हणून धार्मिक मान्यता आहे. या ठिकाणी भाविकांनी मागितलेले प्रत्येक नवस, मागणं पूर्ण होत असल्याची अख्यायिका आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख म्हणून परिचित आहे अशी माहिती मंदिराचे पुजारी आणि मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शशांक टोपरे यांनी दिली.
औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळलेणीच्या जवळच घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे. हे एक प्राचीन महादेवाचं मंदिर आहे. या ठिकाणाचे उल्लेख रामायण, महाभारत, शिवपुराण, स्कंदपुराण या ग्रंथात आढळतात. वेरूळ गावातील येळगांगा नदीजवळ हे प्राचीन मंदिर असून मंदिराचं बांधकाम लालरांगाच्या दगडाने करण्यात आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा आणि शहाजी राजे भोसले यांचे वडील मालोजीराव भोसले यांनी १६व्या शतकात मंदिराचा जीर्णोद्धार केला. या नंतर अहिल्याबाई होळकर यांनी १७९१ मध्ये परत एकदा या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. अंबरनाथचं प्राचीन शिवमंदिर हे तब्बल ९६३ वर्षांचं… महाशिवरात्रीला ७ ते ८ लाख भाविक येण्याची शक्यता
घृष्णेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी दररोद देश विदेशातून भाविक वेरूळला दाखल होत असतात. शिवाय श्रावण महिन्यातही दर सोमवारी भाविकांची गर्दी होत असते. मात्र महाशिवरात्रीला विशेष धार्मिक महत्व असल्याने लाखो भाविकांची गर्दी दर महाशिवरात्रीच्या दिवशी पाहायला मिळते. यावर्षी करोनाचे सर्व नियम शिथिल करण्यात आल्याने सुमारे सात ते आठ लाख भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज आहे.
पूर्वी मंदिरामध्ये भाविकांकडून मोठ्या प्रमाणात अभिषेक होत होते. मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंदिरामध्ये अभिषेक करण्यास बंधनं घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय पूजा महाशिवरात्रीच्या मध्यरात्री १२ वाजता संपन्न होणार आहे. तर महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी चार वाजता पालखी निघणार आहे. यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती मंदिराचे पारंपारिक पुजारी आणि मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शशांक टोपरे यांनी दिली.