ही पटकथा आधीच तयार होती – संजय राऊत
“निवडणूक आयोगाने सत्य आणि न्यायचे धिंडवडे काढले. चाळीस बाजार बुणगे बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दावा सांगतात आणि निवडणूक आयोग त्यास मान्यता देते. ही पटकथा आधीच लिहून तयार होती. देश हुकूशाहीकडे निघाला आहे. निकाल आमच्या बाजूनेच लागेल असे गद्दार सांगत होतेच. खोके चमत्कार झाला! लढत राहू”, असं ट्वीट करत संजय राऊतांनी निवडणूक आयोग, शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.
धनुष्यबाण चिन्ह मिळावं यासाठी दोन्हीही गटांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरु होते. त्यासाठी कागदोपत्री पुरावे सादर करण्यात आले. तीच कागदपत्रं पाहून निवडणूक आयोगानं शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह सुपूर्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
येत्या दोन ते तीन महिन्यांत राज्यात महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या अगोदर शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाला या फायदा नक्कीच होणार आहे.