मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत संघर्षावरून गेले सात-आठ महिने विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या धुमश्चक्रीतील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मैदानातील लढाईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी बाजी मारली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हीच खरी शिवसेना असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले; त्याचबरोबर, धनुष्यबाण हे शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह देखील शिंदे यांच्याच गटाला देण्याचा निर्णय आयोगाने जाहीर केला. आयोगाच्या या निर्णयाने शिंदे समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण असून, उद्धव ठाकरे यांच्या गटाला या निर्णयाने मोठा हादरा बसला आहे. शिवसेनेतील या घडामोडींबाबत आता इतर राजकीय पक्षांकडूनही प्रतिक्रिया देण्यात येत असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना थेट रामायणातील दाखला देत केंद्रातील सत्ताधारी भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

‘रावण धनुष्य उचलू शकला नाही, त्याचा अपमान झाला…नंतर त्याने सीता पळवली आणि रामायण घडलं. मात्र कलयुगातील रावणानं त्यातून बोध घेतला आणि आधी रामायण घडवलं…मग सत्ता पळवली आणि शेवटी मायावी शक्तीने धनुष्यही उचललं. आता मतदार श्रीरामाच्या रुपात येतील त्यावेळीच हे रामायण पूर्ण होईल, अशी मला खात्री आहे,’ अशा शब्दांत राजू शेट्टी यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला आहे.

धनुष्यबाण-शिवसेना नाव शिंदे गटाकडे, ‘सामना’ मुखपत्रातून ठाकरे गटाचा कोणावर निशाणा?

राजू शेट्टी हे २०१९ च्या निवडणुकीपासून महाविकास आघाडीसोबत होते. मात्र सत्ताकाळात त्यांचे आघाडीच्या नेत्यांसोबत मतभेद झाले आणि ते आघाडीपासून दूर गेले. मात्र शिवसेनेतील फुटीनंतर आणि त्यावर निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बाजू घेत भाजपविरोधात हल्लाबोल केला आहे.

राऊतांकडूनही संताप

शिवसेना पक्षचिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानतंर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आक्रमकपणे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य तोडून आता असत्यमेव जयते करावे लागेल. खरेदी, विक्री कुठपर्यंत गेली आहे, हे स्पष्ट झाले. जो पक्ष बाळासाहेब ठाकरे आणि लाखो शिवसैनिकांनी रक्त आणि बलिदान देऊन उभा केला, तो पक्ष आणि चिन्ह ४० बाजारबुणगे विकत घेतात, याची नोंद इतिहासात राहील. देशातील निवडणूक आयोगावरचा विश्वास जनतेने गमावला. या देशामधील सर्व स्वायत्त यंत्रणांना गुलाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातीलच हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. न्यायालय, तपास यंत्रणा, निवडणूक आयोग कुणाचे तरी गुलाम असल्यासारखे वाटत आहे. या निर्णयाला आम्ही नक्कीच आव्हान देऊ. पण ४० बाजारबुणगे पैशांच्या जोरावर बाळासाहेबांची शिवसेना आणि धनुष्यबाण विकत घेऊ शकत असतील तर देशातील जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास उडून जाईल. हे सर्व दबावाखाली झाले आहे. महाराष्ट्रावर सूड उगवण्याचा हा प्रयत्न आहे. भविष्यामध्ये महाराष्ट्राची राजधानी मुंबईवर शिवसेना किंवा मराठी माणसाचा अधिकार राहू नये, यासाठी फेकलेला हा फास आहे,” असं राऊत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here