इंदिरा गांधी यांना याच पद्धतीनं काँग्रेस पक्षापासून बेदखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना गाय वासरु चिन्ह घेऊन लढावं लागलं होतं. आजच्या सारखी प्रसारमाध्यमं नसताना देखील इंदिरा गांधी यांनी ३५० पेक्षा अधिक खासदार निवडून आणले होते, असं ओमराजे निंबाळकर म्हणाले. इतिहासाची पुनरावृत्ती कायमस्वरुपी होत आहे. त्याचीच पुनरावृत्ती होत आहे. लोकांचा मूड काय आहे हे त्यांनी दाखवून दिलं आहे. लोक सार्वत्रिक निवडणुकांची वाट बघत आहेत. आता आपल्या देशात लोकशाही शिल्लक आहे का प्रश्न प्रत्येकानं आपल्या मनाला विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. आयोग ज्या पद्धतीनं निर्णय घेतंय ते पाहता सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मै है देखते है जोर कितना बाजूए कातील मै है, असं म्हणत आम्ही लढाई साठी तयार असल्याचं ओमराजे निंबाळकर म्हणाले.
सामान्य जनता लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न सुरु आहे त्याचा जाब जनता विचारल्याशिवाय राहणार नाही, असं ओमराजे निंबाळकर म्हणाले. उद्या भाजपचे दोन तृतियांश खासदार फुटले तर कमळ चिन्ह आणि पक्ष फुटलेल्या खासदारांना देणार का असा सवाल ओमराजे निंबाळकर यांनी केला. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, इंदिरा गांधी यांच्या कालखंडातील प्रसंगाची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही, असं ओमराजे निंबाळकर म्हणाले.
आजचा निवडणूक आयोगाचा निर्णय हा अनपेक्षित नाही. २०१४ पासून देशातील कुठलिही स्वायत्त यंत्रणा ही स्वायत्त राहिलेली नाही. निवडणूक आयोगाकडे लाखो शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शपथपत्र दिली होती. जरी तुम्ही त्यांना धनुष्य बाण चिन्ह, शिवसेना हे नाव दिलं असलं तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे लोकांच्या मनातील नाव कसं काढणार असा सवाल आमदार कैलास पाटील यांनी केला. चिन्ह कुठलंही असलं तरी महाराष्ट्रातील जनता उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावालाच पाहून मतदान करेल, असं कैलास पाटील म्हणाले.