औरंगाबाद शहरातील एका ठिकाणी आयोजित वास्तुशांतीचा कार्यक्रम आटपून उषा पवार स्कूटीवरुन आपल्या मुलासोबत जावयाच्या घराकडे निघाल्या होत्या. लक्कडकोट येथील रस्त्यावरील खड्ड्यांमधे स्कूटी आदळून त्या खाली पडल्या. याच वेळी पाठीमागून येत असलेल्या ट्रकने त्यांना चिरडले. यात उषा पवार यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून शव विच्छेदनासाठी सामान्य जिल्हा रुग्णालयात पाठविला.
महिलेच्या मृत्यूमुळे नागरिकांचा संताप
महिलेच्या मृत्यूमुळे नागरिक संतप्त झाले, नागरिकांनी घटनास्थळी जालना पालिका प्रशासन व शहर वाहतूक शाखेच्या विरोधात आंदोलन केले, सोबतच नागरिकांनी पालिका प्रशासन व शहर वाहतूक शाखेच्या प्रशासनाविरुद्ध रस्ता रोखून जोरदार घोषणाबाजी केली.
जड वाहतुकीवर बंदीची मागणी
जालना शहरात सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत जड वाहनांना बंदी आहे तरी देखील लक्कडकोट ते दत्त मंदिर या रस्त्यावरून सर्रासपणे जड वाहनांची वाहतूक सुरु आहे. तरी शहर वाहतूक शाखेने या रस्त्यावरील वाहनांना बंदी घालावी अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.
परिसरातील नागरीकांचा रोष पाहता पोलिसांनी लक्कडकोट भागातील दोन्ही बाजूंनी जड वाहनास बंदी घालण्यासाठी लोखंडी कमान किंवा इतर उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले आहे.
लिंग परिवर्तनासाठी नांदेडच्या महिला पोलिसाचा दोन वर्षांपासून संघर्ष; लागणारा खर्च शासनानं करण्याची मागणी