आत्महत्या करण्यासाठी निघालेला तरुण २०१९ मध्ये मुंबईत आला. त्यानं चहाचा स्टॉल सुरू केला. मात्र लॉकडाऊनमुळे तो बंद करावा लागला. मित्राकडून कर्ज घेऊन त्यानं लॉकडाऊनमधील खर्च भागवला. त्यानंतर त्यानं कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला. मात्र काही जणांना दगा दिल्यानं त्याला पुन्हा नुकसान झालं. तरुणानं केलेली ट्विट्स पाहून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. त्याचं लोकेशन सुरुवातीला दादरमध्ये होतं. मग ते घाटकोपर, कर्जत आणि तळेगाव दिसलं.
‘तरुणानं केलेली ट्विट पाहताच क्राईम ब्रांच आणि सायबर पोलिसांनी त्याच्याविषयी माहिती मिळवण्यास सुरुवात केली. तो अधूनमधून फोन ऑफ करत होता. अखेर सकाळच्या सुमारास तरुण आम्हाला सापडला. त्याचं समुपदेशन करण्यात आलं आहे,’ असं क्राईम ब्रांचच्या सहआयुक्त लक्ष्मी गौतम म्हणाल्या.
सोशल मीडिया पोस्टच्या आधारे सायबर क्राईमनं तरुणाचा आयपी ऍड्रेस शोधून काढला. त्याच्या आधारे पोलीस पथक चुनाभट्टीतील घरात पोहोचलं. मात्र त्या घराला कुलूप होतं. ‘मला लहानपणापासूनच खूप शिकायचं होतं. मात्र कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिकता आलं नाही. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं मी नोकरी सुरू केली. मात्र त्यातून करिअर होणार नाही याची जाणीव झाली. त्यामुळे बँकेकडून कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला. मात्र अनुभव असल्यानं पदरी अपयश आलं. सुरुवातीला नुकसान झालं. मात्र मोठ्या प्रयत्नानं त्यातून सावरलो,’ असं तरुणानं ट्विटमध्ये म्हटलं होतं.