अकोला जिल्ह्यातील सांगवी खुर्द येथील अतुल संजय वायधने (वय २३) याचं बाळापुर तालुक्यातील अमृता (बदललेले नाव) या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबध होते. ही बाब मुलीच्या कुटुंबाला समजली. त्यामुळे मुलीवर दबाव आणून कुटुंबीयांनी अतुल वायधने याच्याविरूद्ध उरळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. त्यानंतर ३१ डिसेंबर २०२२ रोजी युवकाने मुलीस पळवून पुण्याला नेले.
याप्रकरणातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर युवक मुलीला घेऊन १६ फेब्रुवारीला शिवसेना वसाहतीत राहणाऱ्या मावशीकडे आला होता. २० फेब्रुवारी रोजी मुलीसोबत युवक उरळ पोलीस ठाण्यात हजर हाेणार होता. परंतु पोलीस ठाण्यात हजर होण्यापूर्वीच दोघांनी विषारी औषध प्राशन केले आणि उरळ येथे आले. प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरच दोघे कोसळल्याने पोलिसांनी त्यांना तातडीने सर्वोपचार रूग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान अतुल वायधने याचा मृत्यू झाला. तर मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. याप्रकरणात उरळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
पोलिसांच्या दबावामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
अतुल बायधणे याने उरळ पोलिसांच्या दबावाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे. उरळ पोलिस स्टेशनचे पीएसआयवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह न उचलण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. नातेवाईकांनी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची भेट घेत, याप्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली. पोलिस अधीक्षक घुगे यांनी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी अतुलचा मृतदेह ताब्यात घेतला.
मुलीने लिहलेली चिट्ठी
घरच्यांच्या दबावमुळे मी अतुलचा पोलिसांत खोटा रिपोर्ट दिला. माझं अतुलवर खूप प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार होतो. एक दिवस आम्ही दोघे बोलत असताना काकांना दिसलो आणि काकांना मला आणि अतुललाही मारहाण केली. जेव्हापासून आमचं प्रेम घरच्यांना माहिती पडलं तेव्हापासून त्यांच्याकडून आम्हाला प्रचंड त्रास झाला. नेहमी सतत टोमणे मारायचे. माझे बाबा काठीने माझ्या पायावर मारायचे. जेवण सुद्धा द्यायचे नाही. शाळा ही बंद केली. शेतात पाठवायचे. शाळेसाठी लागणाऱ्या लेटर वह्यांसाठी घरच्यांना पैशाची मागणी केली, पण त्यांना वाटायचं की मी अतुलसाठी पैसे मागते. असह्य त्रास मला घरी भोगावा लागत होता. यासाठी अतुलला म्हटलं मला इथून घेऊन जा, अन्यथा मी जीव देईल. तेव्हा ते मला ३१ डिसेंबर २०२२ ला पुण्याला घेऊन गेले. त्यानंतर पोलीस अतुलच्या कुटुंबीयांना प्रचंड त्रास देत होते. अतुलच्या मोठ्या भावाला पोलीस म्हणायचे तू त्या दोघांना घेऊन ये नाहीतर तुलाच आत टाकू अशी धमकी द्यायचे. आता आम्ही दोघेही या गोष्टींना कंटाळलो आहोत. त्यामुळे माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार उरळ पोलीस राहतील. बस आता आमच्या दोघांना जगू द्या, आमचं लग्न लावून द्या एवढीच माझी इच्छा आहे.
युवकाने मुलीला पळवून नेल्याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान मृतकावर कोणताही दबाव पोलिसांनी आणला नाही. पोलिसांनी कारवाईदरम्यान कोणालाही धाकदपटसुद्धा केली नाही. कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रयत्न केला.
अनंत वडतकर, ठाणेदार उरळ पोलिस स्टेशन