अग्निशमन दलाच्या गाडीने पाण्याचे फवारे सोडल्यानंतरही मधमाशांनी दुचाकी स्वाराला दंश करणे सोडलं नाही. खामगाव तालुक्यातील अंत्रज येथील शेतकरी जगन्नाथ नामदेव देवळे (वय ५८) काल रविवारी सकाळी साडेनऊ वाजता गावातून खामगावकडे येण्यासाठी निघाले. गावापासून तीन किलोमीटर पेक्षा अधिक अंतर कापल्यानंतर गारडगाव नजीक सिंधी नाल्यावर अचानक मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला.
त्यामुळे चे दुचाकीवरुन जागीच खाली कोसळले. खाली कोसळ्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर शेकडो मधमाशांनी दंश केला. त्यातच ते बेशुद्ध झाले. त्यानंतरही तब्बल दोन तासांपेक्षा अधिक काळ मधमाशा त्यांच्या भोवती घोंगावत होत्या. यावेळी रस्त्याने ये-जा करणाऱ्या तब्बल वाहनधारकांची दोन्ही बाजूंनी गर्दी झाली होती. ग्रामस्थांना माहिती दिल्यानंतर पोलीस आणि प्रशासनाने नगरपालिकेचे अग्निशमन विभागाची गाडी बोलावली.
घटनास्थळी दाखल झालेल्या वाहनातून बेशुद्ध अवस्थेत असलेल्या जगन्नाथ देवळे यांच्यावर पाण्याचे फवारे सोडण्यात आले. मात्र, तरीही मधमाशांनी त्यांना दंश करणे सोडलं नाही. उलट मधमाशांनी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या दिशेने आपला मोर्चा वळविला. त्यामुळे मधमाशांनी कर्मचाऱ्यांनाही दंश केलं. जीवाच्या भीतीने कर्मचाऱ्यांनी गाडीच्या केबिनची मदत घेतली. काही वेळानंतर देवळे यांना खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.