heat wave in maharashtra news, कोकणसाठी पुढील दोन दिवस महत्त्वाचे, दुपारी ११ ते २ मध्ये घराबाहेर पडणे टाळा, हवामान विभागाचा अलर्ट – imd forecasts ‘abnormal’ temperatures for kokan and mumbai
मुंबईः राज्यातील थंडीचा कडाका गेल्या काही दिवसांपासून कमी झाला असून तापमानात वाढ झाली आहे. राज्यात पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तर, कोकण किनारपट्टीवर उष्णतेच्या लाटांची भीतीही व्यक्त केली आहे. या दोन दिवसांत ३७ ते ३९ पर्यंत तापमान वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, विशेष म्हणजे कोकण विभागाला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणात उष्णतेच्या लाटेचा अधिक प्रभाव असेल. मात्र, राज्यातील इतर जिल्ह्यांना मात्र उष्णतेच्या लाटेचा फटका बसणार नाही, असं प्रादेशिक हवामान विभागाने म्हटलं आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा अधिक त्रास होण्याची शक्यता आहे. कच्छमध्येही अधिक उष्णता जाणवेल. हवामान विभागाने दोन दिवसांसाठी हा इशारा दिला आहे. म्हणजेच आज आणि उद्यासाठी हा इशारा दिला आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईकरांचा प्रवास होणार आणखीनच बेस्ट; मार्चपर्यंत २८० नव्या एसी बस होणार दाखल पुढील दोन दिवसांत कोकण किनारपट्टीत उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे हवामान खात्याने दुपारी ११ ते २ यावेळेत घराबाहेर न पडण्याचा आवाहन केलं आहे. तसंच, नागरिकांना काळजी घेण्यासही सांगितलं आहे. तसंच, जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. दरम्यान, गोव्यातही कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. तापमानाचा पारा ३७ ते ३९ अंशादरम्यान जाईल. तीन दिवसांनंतर कमाल तापमानात २ ते ३ अंशांची घट जाणवू शकेल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान, मुंबईत पुढील पाच दिवस आकाश निरभ्र असल्याने सूर्याची किरणे अधिक त्रासदायक ठरु शकतात. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र तापमान फारसे चढे राहणार नाही. विदर्भातही कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांहून अधिक नोंदवला गेला आहे. फेब्रुवारीतच बसणार उन्हाचे चटके, ‘या’ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटांची शक्यता