बागेला लागलेला वणवा विझवताना घडली दुर्दैवी घटना
गेले काही दिवस कोकणला वणव्यांचा शाप लागला आहे. गेल्या काही महिन्यात अनेक बागा, जंगल वणव्यात होरपळून खाक झाल्या आहेत. असंच काहीसं गोविंद विश्राम यांच्याबाबतही घडलं. रत्नागिरी तालुक्यात असलेल्या मुंबई गोवा महामार्गाजवळ हातखंबा येथे असेलेल्या त्यांच्या आंबा आणि काजूच्या बागेतही वणवा पेटला. ही माहिती मिळताच गोविंद विश्राम हे तात्काळ आपली वाग वाचवण्यासाठी गेले. मात्र, बागेला लागलेला हा वणवा विझवण्यात त्यांना यश आलं नाही. उलट यात ते त्यांचं आयुष्य हरले आहेत. या वणव्यात एका वृद्धाचा होरपळून मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येते आहे.
या वणव्यात बागेचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेचे वृत्त कळताच रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा पाली विभागाचे महसूल विभागाचे मंडळ अधिकारी कांबळे, तलाठी वाडकर, सरपंच जितेंद्र तारवे, उपसरपंच सुनील डांगे तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घेतली. या सगळ्या प्रकरणाचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. या सगळ्या घटनेचा पंचनामा महसूल, कृषी विभाग आणि पोलिसांकडून करण्यात येत आहे. या घटनेची आकस्मिक नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आले आहे अधिक तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत. या सगळ्या घटनेनंतर आता कोकणात लागणारे हे वारंवार वणवे आणखी किती शेतकऱ्यांचे बळी घेणार हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.